मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार पार्थ पवार यांनी सातत्याने चालवलेल्या एकाधिकारशाहीमुळे नाराज झालेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. आसाम मधील हेमंत बिसवा शर्मा यांच्या शपथविधीनंतर प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत गुवाहाटीहून एकत्र मुंबईपर्यंत आले. रात्री उशिरा सुनील तटकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली.
या भेटीचा तपशील अद्याप समोर आला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेस मधील अस्वस्थता या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. मंगळवार दि. 12 रोजी सुनील तटकरे यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. पार्थ पवार पित्याचा निधनानंतर पक्षातील ज्येष्ठांशी सल्लामसलत करत योग्य निर्णय घेतील आणि पक्षाला पुढे नेतील असे वाटत असतानाच प्रत्यक्षात त्यांनी ज्येष्ठांना विश्वासात घ्यायचेच नाही असे ठरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा मानले जातात. त्यांनाही मानाचे पद दिले नसल्याने बेरजेच्या राजकारणाचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसला विसर पडला असल्याचे मानले जाते. पार्थ यांच्या आक्रमक स्वभावावर ज्येष्ठ नेते नाराज होतेच. मात्र जय हे अजित पवार यांचा वारसा चालवण्यासाठी पुढे येतील असेही बोलले जात होते. मात्र जय यांनीही कार्यकारणीत स्वतःसाठी महत्त्वाचे पद मिळवत अन्य नेत्यांवर अन्याय केला असल्याची भावना बोलली जात होती.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बुधवारी मुंबईत काही ज्येष्ठ नेत्यांनी या संदर्भात भेटायचा प्रयत्न केला असेही समजते. राष्ट्रवादी काँग्रेस मधील ही अंतर्गत धुसफूस येत्या काही दिवसात वादळ होऊ शकेल याची जाणीव त्यांना काही जवळच्या मंडळींनी करून दिली आहे असे म्हणतात. पार्थ यांच्याशी चर्चा करण्याची भूमिकाही काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली होती मात्र त्यांची भेट होऊ शकली का हे समजले नाही.
गुवाहाटी येथे पार्थ पवार यांनी हेमंत विश्वास शर्मा यांच्या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचेही बोलले जाते. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ नये अशी भारतीय जनता पक्षाची इच्छा असल्याचे सांगितले जाते आहे. मात्र त्यामुळे पक्षात विसंवाद निर्माण झाला तर फडणवीस यांनी मध्यस्थी करावी असे विचारले तर काय याबाबत अद्याप भाजपने कोणतीही भूमिका घेतलेली नाही तसेच प्रतिक्रियाही व्यक्त केलेली नाही.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनीही अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्यावर पक्षात अन्याय होतो आहे आणि तो अन्याय पार्थ यांच्या भूमिकेमुळे होत असल्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे मानले जाते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मधील 22 आमदार तटकरे आणि पटेल यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात जातील या रोहित पवार यांच्या विधानात कोणताही अर्थ नसल्याचे बोलले जात होते.
फूट पडली तर राष्ट्रवादी अजित पवार गटातील मंडळींना भारतीय जनता पक्ष प्रवेश देणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या स्पष्ट केले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षातील राजकारणाबाबत भारतीय जनता पक्ष हा बघ्याची भूमिका निभावेल असे मानले जाते आहे. फडणवीस यांनी या दोन नेत्यांशी काय चर्चा केली याचा तपशील मात्र समजू शकला नाही.