पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे भागांत मध्यम ते जोरदार (७० ते १०० मिलिमीटर) पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल; तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने विविध ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Updates)
हवामान विभागाने मुंबईसह, ठाणे, पालघरमध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर या भागात २१ जुलै ते २३ जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याने तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. रायगडमधील काही भागात आज अतिवृष्टीची शक्यता असल्याने येथे रेड अलर्ट दिला आहे. रत्नागिरीमध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सिंधुदुर्गमधील काही भागात आज अतिवृष्टीची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस येथे मुसधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे, कोल्हापूर येथे आज अतिवृष्टीची शक्यता असल्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. साताऱ्यातील काही भागात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियासाठी उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे १९ ते २१ जुलै दरम्यान कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या अंतर्गत भागात, मध्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी दिली आहे.