मुंबई / पुणे :
मान्सून मुंबईसह कोकण आणि विदर्भात अधिक तीव्र झाला असून, शुक्रवार आणि शनिवारी या तिन्ही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून कुंड सध्या मध्य भारतावर सक्रिय आहे आणि त्याच्या सामान्य स्थितीच्या आस दक्षिणेस आहे. यामुळे गुजरात ते केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. यास्तव कोकण, मुंबई, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकणात १९ ते २३, तर विदर्भात १९ ते २१ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. १९ ते २० जुलैदरम्यान
मुंबईसह कोकण, विदर्भाला रेड अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मुसळधार ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.
बुधवारी मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट होता. त्यामुळे अनेक भागांमध्ये दमदार सरी कोसळल्या. सायंकाळच्या सुमारास बोरिवलीसह विरार दरम्यान चांगला पाऊस पडला. शुक्र वारी रेड अलर्ट असला तरी आयएमडीचा अंदाज हा सकाळी ८.३० वाजेपर्यंतचा असल्याने दिवसभरात काही भागांमध्ये मोठा पाउस पडू शकतो. सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेने शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसे झाल्यास मुंबईतील जनजीवन पुन्हा ठप्प होऊ शकते.