Engineering Admission Pudhari File Photo
मुंबई

Engineering Admission : अभियांत्रिकीच्या चौथ्या फेरीत 68,640 विद्यार्थ्यांचा प्रवेश

आता थेट संस्थास्तरावर राबवली जाणार प्रवेश फेरी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली असून या फेरीसाठी पसंतीक्रम भरलेल्या ८३ हजार ५ विद्याथ्यापैकी ६८ हजार ६४० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी निवड झाली आहे. आता या विद्यार्थ्यांना त्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे क्रमप्राप्त आहे. या जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २ ते ४ सप्टेंबर दरम्यान लॉगिनद्वारे अलॉटमेंट 'सेल्फ-व्हेरिफाय' करून प्रवेश निश्चित करणे आणि फी ऑनलाईन भरणे बंधनकारक असणार आहे. यानंतर आता थेट संस्थास्तरावर प्रवेश फेरी राबवली जाणार आहे.

यंदा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे पहिल्या, तीन आणि सहा पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयात अलॉटमेंट मिळाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश ऑटोफ्रीज केला. तरीही मिळालेले पसेंटाइल आणि विविध महाविद्यालयांच्या कट-ऑफ याचा विचार न करता विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमामुळे अनेकांना अलॉटमेंट मिळाल्या नाहीत. त्यामुळे तिसऱ्या फेरीपर्यंत फक्त ९५ हजार २५३ विद्यार्थ्यांचीच प्रक्रिया पार पडली.

यंदाच्या या प्रवेश प्रक्रियेत तीन फेऱ्यांमध्ये मिळून तब्बल ५७६२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेण्यास नकार दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना थेट संस्थात्मक फेरीतून प्रवेश घेणे अनिवार्य आहे. हे विद्यार्थी कॅप फेरीच्या बाहेर पडल्याने चौथ्या फेरीत उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यात बळावली होती. चौथ्या फेरीत एकूण १ लाख ८४ हजार ५२८ जागांसाठी ८३ हजार ५ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. त्यापैकी सुमारे ८२.७० टक्के म्हणजेच ६८ हजार ६४० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. प्रवेश अलॉट झाले असून आता या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. या महाविद्यालयात प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी थेट संस्थात्मक प्रवेश फेरीत फेकला जाणार आहे.

संस्थानिहाय गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देणार

संस्थात्मक प्रवेश फेरीत व्यवस्थापन कोट्याच्या २० टक्के जागांसह चारही कॅप फेऱ्यांनंतर शिल्लक राहिलेल्या जागा उपलब्ध असतील. या फेरीत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर किंवा सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरून थेट महाविद्यालयात अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यानंतर संस्थानिहाय गुणवत्ता यादी जाहीर होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT