मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडला, आंदोलन संपले, पण त्यावर राजकीय दुकान मांडणाऱ्यांचा हिरमोड झाला. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबईमध्ये नेस्को सेंटर येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती जाणीवपूर्वक गर्दी जमवण्यात आली. हा निषेध नव्हता, तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी त्यांच्यावरही टीकास्त्र सोडले, महाराष्ट्रातून काही नेते विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन ‘आग लागली आहे, ती विझू देऊ नका’, अशी भडकाऊ भाषा करत होते.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकारण मिसळून राज्यात पेटवापेटवी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांचे राजकारण फेटाळून लावले. आंदोलन संपताच त्यांचा राजकीय अजेंडा कोसळला, असा घणाघात त्यांनी केला.