मुंबई: डिजिटल युगात इअरफोन आणि हेडफोनचा वाढता वापर तरुणांच्या श्रवणशक्तीसाठी धोकादायक ठरत असून, 20 ते 30 वयोगटातील 10 पैकी 6 तरुणांना श्रवणविषयक तक्रारी जाणवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोठ्या आवाजात आणि दीर्घकाळ इअरफोन वापरण्यामुळे ही समस्या झपाट्याने वाढत आहे.
आधुनिक जीवनशैलीत काम, प्रवास, मनोरंजन आणि गेमिंगसाठी तासन्तास इअरफोन वापरण्याची सवय वाढली आहे. मात्र सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने कानाच्या आतील नाजूक पेशींवर परिणाम होतो. श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम होत असून, वेळीच सावधगिरी न घेतल्यास भविष्यात मोठा आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. अंकित जैन म्हणाले, इअरफोन्स हा दैनंदिन जीवनाचा भाग झाला असला तरी मोठ्या आवाजामुळे कानातील संवेदी पेशींना कायमस्वरूपी हानी पोहोचू शकते. एकदा या पेशींचे नुकसान झाले की त्या पुन्हा तयार होत नाहीत. त्यामुळे 20-30 वयोगटातील सुमारे 60 टक्के तरुणांमध्ये श्रवण क्षमतेशी संबंधित लक्षणे दिसून येत आहेत.
ते पुढे म्हणाले, “10 पैकी 6 तरुण कानात आवाज येणे (टिनिटस), स्पष्ट ऐकू न येणे किंवा वारंवार आवाज वाढवण्याची गरज भासणे अशा तक्रारी नोंदवतात. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास कायमस्वरूपी श्रवणदोष होऊ शकतो.
कान नाक घसा सर्जन डॉ. नेहा पंगम म्हणाल्या, दरमहा 20 ते 30 वयोगटातील सुमारे 40 टक्के तरुणांमध्ये श्रवण समस्यांची सुरुवातीची लक्षणे दिसतात. गर्दीत ऐकू न येणे, वारंवार लोकांना पुन्हा बोलण्यास सांगणे, कानात दाब जाणवणे अशा तक्रारी वाढत आहेत.
शहरातील वाढता गोंगाटही या समस्येला कारणीभूत ठरत आहे. ट्रॅफिक, बांधकामे आणि सार्वजनिक ठिकाणांवरील आवाजामुळे अनेकजण इअरफोनचा आवाज वाढवतात, ज्याचा थेट परिणाम कानांवर होतो.
काय काळजी घ्यावी?
श्रवणशक्तीचे संरक्षण करण्यासाठी इअरफोनचा आवाज मध्यम ठेवणे, सलग वापर टाळणे, दरम्यान विश्रांती घेणे. गोंगाट असलेल्या ठिकाणी काळजी घेणे नियमित श्रवण तपासणी करून घ्यावी.