मुंबई: धारावीच्या सेक्टर सहापासून पुनर्वसन इमारतींच्या बांधकामास सुरुवात होणार असून, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी घरे रिकामी करा, असे आदेश जारी झाले आहेत.
विशेष म्हणजे धारावीतील घर रिकामे केल्यानंतर या रहिवाशांना स्थलांतरासाठी एकरकमी पाच हजार रुपयाचे अनुदान मिळणार असून, भाड्याने राहण्याचा पर्याय स्वीकारणाऱ्या पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळेपर्यंत दरवर्षी 5 टक्के वाढीसह भाडे अनुदान दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. हे भाडे किती मिळेल आणि त्या भाड्यात मुंबईतील किंवा उपनगरात घर मिळेल का हे स्पष्ट नाही.
धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) अंतर्गत माटुंगा रेल्वे परिसरातील सेक्टर-6 मध्ये पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू करण्यासाठी सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. धारावीतील लाखो नागरिकांसाठी ‘की-टू-की’ पुनर्वसन घरे उभारण्यासाठी गणेशनगर -मेघवाडी, एसव्हीपी नगर, आजाद नगर अ व ब, आजाद नगर क तसेच कमला रमण नगर या भागांतील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक असल्याचे ही सूचना बजावते.
या भागातील रहिवाशांनी मान्सून सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभापूर्वी आपली घरे रिकामी करावीत, असे आवाहन या सूचनेतून करण्यात आले आहे. रहिवाशांनी लवकर स्थलांतर केल्यास एकाच वेळी विविध ठिकाणी बांधकाम सुरू करता येईल आणि पुनर्वसन घरे लवकर उपलब्ध करून देता येतील, असे एका डीआरपी अधिकाऱ्याने सांगितले.
डीआरपीच्या माहितीनुसार, माटुंगा येथील रेल्वे जमीन धारावी अधिसूचित क्षेत्रात (डीएनए) समाविष्ट करताना ती मोकळी जमीन असल्याचे गृहीत धरले होते. मात्र, या जमिनीवर झोपडपट्टीधारक वास्तव्यास असल्याने बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांचे स्थलांतर अपरिहार्य आहे. स्थलांतर प्रक्रियेसाठी रहिवाशांना तात्पुरत्या निवासस्थानी (ट्रान्झिट ॲकमोडेशन) राहण्याचा किंवा भाड्याच्या घरात स्थलांतर करण्याचा पर्याय देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.