Dharavi Protest Pudhari
मुंबई

Dharavi Protest: तळपत्या उन्हात धारावी झोपडपट्टीवासीयांचा अदानी कंपनीवर मोर्चा

या प्रकल्पाचे सादरीकरणही लोकांसमोर करीत नाही.यामुळे येथील रहिवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी ही धारावीत आहे.येथील झोपड्यांचा पुनर्विकास हा अदानी समूहाच्या मे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.परंतु येथील झोपडपट्टीवासीयांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार- अदानी कंपनी कोणतेही लेखी आश्वासन देत नाही.

या प्रकल्पाचे सादरीकरणही लोकांसमोर करीत नाही.यामुळे येथील रहिवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे.येथील सर्व पात्र-अपात्र रहिवाशांना धारावीत घरे द्यावीत, तिही घरे 500 चौ.फू.ची द्यावी या दोन प्रमुख मागण्यांबाबत सरकार-अदानी कंपनी काहीही लेखी आश्वासन देत नाही.यामुळे संतापलेले हजारो धारावीकर उद्या सोमवारी सकाळी 11 वा. माटुंगा येथील अदानी कंपनीच्या कार्यालयावर तळपत्या उन्हाची पर्वा न करता जनआक्रोश मोर्चा घेऊन धडकणार आहेत.

BMC budget 2026: बजेटचा निधी नगरसेवकांना खर्च करता येणार नाही!हा मोर्चा धारावीमधील कुंभारवाडा येथून निघेल.अदानी कंपनी-राज्य सरकार यांच्या विरोधात लिहिलेले फलक घेऊन...निषेधाच्या घोषणा देत मोर्चेकरी माटुंग्याकडे तळपत्या उन्हात, 35 डिग्री सेल्सिअस तापमानाची पर्वा न करता मार्गस्थ होतील.

धारावी प्रकल्पात पारदर्शकता नाही

धारावीत राबवण्यात येत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात अजिबात पारदर्शकता नाही.या प्रकल्पासाठी जमीन घेतली किती,किती झोपड्यांच्या बदल्यात किती घरे उभारणार याबाबत स्पष्टता येणे आवश्यक आहे.

यासंदर्भात अनेकवेळा राज्य सरकार आणि अदानी कंपनीकडे धारावी बचाव आंदोलन या आमच्या संघटनेने स्पष्टीकरण मागितले. पण अजूनही याबाबत सरकार, अदानी कंपनीकडून उत्तर मिळत नाही.तिकडे गोरेगाव येथील मोतीलाल नेहरू पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण केले जात आहे.

धारावी प्रकल्पाचेही अदानी कंपनीने सादरीकरण करावे, असे बाबुराव माने म्हणाले.अदानी कंपनीस पुनर्विकासासाठी सरकारने जमीन किती एकर दिली. त्याबदल्यात धारावीतच सर्व पात्र-अपात्र रहिवाशांना घरे देणे याबाबत लेखी आश्वासन हवे आहे, यासाठी हजारो धारावीकरांचा मोर्चा माटुंग्यात मंगळवारी धडकेल, असेही धारावी बचाव आंदोलनचे नेते बाबुराव माने यांनी म्हटले आहे.

या जनआक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेसच्या खासदार वर्षां गायकवाड, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत, काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड,धारावी बचाव आंदोलनाचे नेते माजी आमदार बाबुराव माने, शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक जोसेफ कोळी,टी.एम.जगदीश,नगरसेविका अर्चना शिंदे,नगरसेविका हर्षला मोरे, काँग्रेसच्या नगरसेविका आशा दीपक काळे,नगरसेवक बब्बू खान, राष्ट्रवादी शपचे धारावीचे अध्यक्ष उलेश गजाकोश,भाकपचे मुंबई सचिव मिलिंद रानडे,नसरुल हक, माजी नगरसेवक प्रकाश नकाशे,सपाचे राहुल गायकवाड,असफाक खान, बिझनेस असोसिएशनचे समीर मंगरु,अन्सार शेख,मनसेचे आरिफ शेख,काँग्रेसचे दीपक खंदारे,शकील चौधरी,आपचे राफेल पॉल, शिवसेनेचे शाखाप्रमुख विठ्ठल पवार,महादेव शिंदे, किरण काळे,आनंद भोसले, मुन्ना शेख, सतीष कटके, मनी कडंन,गणेश तेवर, समन्वयक सुरेश सावंत, गंगा देरबर, विठ्ठल पवार, बसपाचे शामलाल जैस्वार, महादेव शिंदे, कुंचीकोरवे समाजाचे ज्येष्ठ नेते जगन भोसले आदींसह धारावीमधील मोठा जनसमुदाय या मोर्चात उतरणार आहे. यामुळेच या मोर्चाकडे समस्त मुंबईकरांचे लक्ष लागलेले आहे.

मुंबईचे आगरी कोळी हे आद्य भूमिपुत्र आहेत. कोळी बांधव हे तर धारावी अस्तित्वात येण्यापूर्वीपासून येथे राहात आहेत.म्हणून या कोळी बांधवांना या पुनर्विकास प्रकल्पातून वगळावे ही त्यांची मागणी अतिशय रास्त असल्याचे खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे.सरकारने आता मूग गिळून बसण्यापेक्षा सरकारने अदानी कंपनीने धारावी झोपडपट्टीवासीयांस लेखी आश्वासन द्यावे की आम्ही सर्व पात्र-अपात्रांना धारावीतच घरे देऊ, असे आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT