धारावीत 25 वाहने जाळली!  pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : धारावीत 25 वाहने जाळली!

चौघांवर गुन्हा ; किरकोळ वादातून आशीर्वाद सोसायटीतील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सोसायटीतील रहिवाशांसोबत झालेल्या किरकोळ वादातून चार जणांच्या टोळीने पार्किंग केलेल्या वाहनांवर पेट्रोल ओतून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार धारावीत घडला आहे. यात 25 वाहने खाक झाली असून सुमारे 22 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याप्रकरणी आयुब बाबू शेख ऊर्फ चिरा, नियाज अहमद, अरमान आणि वसीम शेख या चौघांविरुद्ध धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे चारही आरोपी आग लावून पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

तक्रारदार वसीम अहमद इद्रीसी हे कापड व्यापारी असून धारावीतील हेरीटेज मैदान, आशीर्वाद सोसायटीमध्ये राहतात. 2023 साली बाईक पार्किंगवरून याच परिसरात राहणाऱ्या आयुब शेख याच्याशी त्यांचा वाद झाला होता. आयुब हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने परिसरात दशहत माजवली आहे.

गेल्या आठवड्यात पुन्हा त्याचा सोसायटीतील काही रहिवाशांसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्याने बघून घेण्याची धमकी रहिवाशांना दिली होती. सोमवारी रात्री उशिरा आयुबसह इतर तीन आरोपींनी सोसायटीसमोरील पार्क केलेली वाहने पेट्रोल ओतून पेटवून दिली.

आग भडकल्यानंतर रहिवासी घटनास्थळी आले असता तिथे आयुब शेख व त्याचे सहकारीही होते. त्याला वाहनांना आग का लावली याबाबत वसीम इद्रीसी यांनी विचारले असता, वाहनाप्रमाणे तुलाही आग लावून राख करून टाकेन अशी धमकी दिली व ते तेथून निघून गेले. तोपर्यंत येथील 25 वाहने जळून खाक झाली.

25 दुचाकी आणि चारचाकी वाहने खाक

  • वाहनांना लावलेल्या आगीची माहिती मिळताच धारावी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

  • लावलेल्या या आगीत वाहनमालकांचे सुमारे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT