मुंबई: उद्धव ठाकरे हे हताश, निराश आणि वैफल्यग्रस्त व्यक्ती आहेत. राजकारणात आता त्यांचे काही स्थान राहिलेले नाही. या निराशेतूनच ते अशी विधाने करत असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार असंवेदनशीत असल्याच्या टीकेला उत्तर दिले.
तसेच, रामरक्षा आंदोलन करणाऱ्या ठाकरेंना रामरक्षा वाचता आली नव्हती, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. रामरक्षेच्या नावावर आंदोलने करता, पण प्रत्यक्षात तुम्हाला ती वाचताही येत नाही, हे कसले आंदोलन, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, रामाच्या नावाने अशा पद्धतीने राजकारण किंवा आंदोलन करणे अजिबात योग्य नाही. तुम्ही रामरक्षेच्या नावावर आंदोलने उभी करता, पण प्रत्यक्षात तुम्हाला ती वाचताही येत नाही. हे तुमचे नक्की कुठले आणि कसले आंदोलन सुरू आहे?, असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर केलेल्या टीकेचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, राहुल गांधींनी हे ट्विट देशातून केले आहे की परदेशातून, हे आधी तपासावे लागेल; कारण ते बऱ्याचदा परदेशातच असतात.