मुंबई: स्वातंत्र्य लढ्यात ९ ऑगस्ट १९४२ ची क्रांती ही इंग्रजांना 'भारत छोडो' म्हणणारी क्रांती होती. आताची क्रांती ही ‘करो या मरो’च्या निर्धाराने विकसित भारत तयार करण्यासाठीची आहे. आजची क्रांती ही भारतविरोधी शक्तींना ‘भारत छोडो’ म्हणण्याची क्रांती आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठी एकदिलाने 'तिरंगा ध्वजा'साठी काम करण्याचे आवाहन केले.
‘हर घर तिरंगा’अभियानांतर्गत वरळी सी-फेस येथील तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी मोठ्या प्रमाणावर हातात तिरंगा ध्वज घेऊन युवा वर्ग सहभागी झाला होता. या रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, महापौर रितू तावडे यांच्यासह भाजप आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आताची क्रांती ही तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे करायची क्रांती आहे. आपल्या माध्यमातून उद्याचा भारत हा एक मजबूत भारत, एक स्वाभिमानी भारत आपण घडवून दाखवू, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत जगातील चौथी सर्वांत मोठी आर्थिक महासत्ता बनलेला आहे. आता भारताला कोणी थांबवू शकत नाही. मात्र, काही शक्ती भारताला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची घोडदौड थांबली पाहिजे म्हणून काही परकीय शक्तीदेखील हा प्रयत्न करत आहेत.
भारत असाच पुढे जात राहिला, तर एक दिवस जगातील सर्वात मोठी महासत्ता भारत देश होईल, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे सातत्याने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये काही ना काही लुडबूड करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, हातात तिरंगा घेऊन बाहेर पडलेली तरुणाई इथे आहे, त्यांना थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, असे फडणवीस म्हणाले.
२०४७ पर्यंत विकसित भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडली आहे. त्याला आता अवघ्या दोन दशकांचा अवधी राहिला आहे. त्यासाठी आता एकदिलाने, एकत्रितपणे काम करायचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही. जाती-पाती, धर्माच्या भेदात अडकून आपल्याला चालणार नाही. वेगवेगळ्या वादांमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही.
नवभारताची जी संकल्पना पंतप्रधान मोदींनी मांडली आहे, तो नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. ही जबाबदारी येत्या काळामध्ये आपण पार पाडू, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
तिरंगा रॅलीत फडणवीसांनी गायले 'ऎ वतन तेरे लिये..'
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणापूर्वी 'ऎ वतन तेरे लिये' हे गीत गात उपस्थितांमध्ये ऊर्जा भरली. निवेदक आणि गायक ब्रिजेश शांडिल्य याने मुख्यमंत्र्यांना 'ऎ वतन..' या गीताच्या दोन ओळी गाण्याची विनंती केली.
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी''दिल दिया है जाँ भी देंगे ए वतन तेरे लिये...हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिय;तु मेरा कर्मा तु मेरा धर्मा,हम जियेंग और मरेंगे, ऎ वतन तेरे लिये''..असे गीत गात सर्वांनाच या गायनात सहभागी करून घेतले.