Devendra Fadnavis
मुंबई: केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्काळ दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर फडणवीस यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा राज्यात सुरू होती. आज यासंदर्भात फडणवीस यांनी "मी मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातच राहणार," असे स्पष्ट करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
नागपूर येथे आज माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या मुंबईतील जल्लोष मेळाव्यावर टीका केली. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांचे प्रश्न हे कुठल्या व्यक्तीचे किंवा पक्षाचे नाहीत. देशाचे हित महत्वाचे असते. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी संवेदनशीलता दाखवत सर्व निर्णय घेतले आहेत," असे ते म्हणाले.
"भारत विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी असे डायलॉग गेल्या दहा वर्षात अनेकवेळा मारले, पण कोणावरही त्याचा परिणाम होत नाही. भारत मोदींच्या पाठीशी आहे," असेही फडणवीस म्हणाले.
"देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिलं आहे. अंधभक्तांविरोधात अखेर देशभक्त जिंकले असून, आता देशात 'भाजप विरुद्ध भारत' अशा मोठ्या संघर्षाची सुरुवात झाली आहे," अशा शब्दांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शिवाजी पार्क येथील जल्लोष मेळाव्यात ते बोलत होते. देशातील तरुण आंदोलकांनी (जेन झी) सरकारच्या झिंंज्या कशा उपटतात, हेच या आंदोलनातून दाखवून दिले आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानिमित्त ठाकरे बंधूंनी मुंबईत जल्लोष मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याच्या सुरुवातीला 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे निराश होऊन जीवन संपवलेल्या २१ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली. तसेच सर्वांना एक मिनिटांचे मौन बाळगून २१ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर "ज्या विद्यार्थ्यांनी या अन्यायामुळे आपले जीवन संपवले आहे, त्यांच्या यातना आणि त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही," असा निर्धार यावेळी करण्यात आला.