मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी (दि. २२) वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यभरात व्यापक सामाजिक उपक्रम आणि ‘सेवा यज्ञ’ राबवण्यात येणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणारे विधेयक संमत केल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या वतीने संघटनात्मक ७२ विभागांमध्ये ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ आयोजित केला जाणार आहे.
याचबरोबर २२ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत ‘राजस्व अभियान’ आणि ‘महारक्तदान महाभियान’ राबवून सर्वसामान्यांच्या विविध समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपच्या वतीने देण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ २२ ते २७ जुलैदरम्यान टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात पार पडणार आहे. २२ जुलै रोजी विदर्भ, २३ जुलैला मराठवाडा, २४ जुलैला पश्चिम महाराष्ट्र, २६ जुलै रोजी ठाणे-कोकण आणि २७ जुलै रोजी उत्तर महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शहरी भागातील महिलांसाठी टेरेस व बाल्कनी गार्डनिंग तसेच हायड्रोपोनिक्स शेतीचे प्रशिक्षण देणारे विशेष किट वितरित केले जाईल. तर, ग्रामीण भागात विशेषतः एकल, विधवा व शेतमजूर महिलांना एकत्र आणून मृदा परीक्षण मार्गदर्शनासह सेंद्रिय खत व बियाण्यांचे ‘कृषी किट’ बायोडिग्रॅडेबल बॅग्जद्वारे वितरित केले जाणार आहे.
महाआरोग्य शिबिरासह विविध उपक्रम
२२ ते २८ जुलै २०२६ दरम्यान राज्यभर ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, कर्करोग निदान, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया पार पडणार आहेत. भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभरात भव्य ‘महारक्तदान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपुरातील रामनगर येथील श्रीराम मंदिर प्रांगणात सकाळी ९ ते १२ या वेळेत ‘श्री लक्ष्मी-नृसिंह महायज्ञ’ पार पडत आहे. यानंतर महाआरती आणि हजारो नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शासकीय ‘राजस्व अभियान’ २२ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान महसूल विभागामार्फत ‘राजस्व अभियान’ राबवले जात आहे. यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना’, सात-बारावरील नोंदींची दुरुस्ती आणि शेतकरी महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष शिबिरे घेतली जात आहेत.