मुंबई : सगळे विरोधक आपल्या विरोधात एकत्र आले आहेत. जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वासाने गाफील राहू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. त्याचवेळी मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने आता त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत. त्यांचा जनाधार संपला आहे, अशी बोचरी टीका करत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर येथील योगी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात फडणवीस बोलत होते. सरकारने केलेल्या कामांचाही लेखाजोखा फडणवीसांनी मांडला. सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत. राज्यातील तीन कोटींपेक्षा जास्त जनता सरकारी योजनांची लाभार्थी आहे. त्यांची मते आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असे फडणवीस म्हणाले.