पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबई येथील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) कडक निर्बंध लादले आहेत. यामुळे ग्राहकांना बँकेतून पैसे काढू शकत नाहीत. दरम्यान, आरबीआयने बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्याची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंधेरी आणि कांदिवली शाखेबाहेर ग्राहकांनी गर्दी केली. आरबीआयने बँकेला नवीन कर्ज देण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई करणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहक सीमा वाघमारे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले, "आम्ही कालच बँकेत पैसे जमा केले. पण त्यांनी त्यावेळी आम्हाला काहीही सांगितले नाही. त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते की बँकेवर अशी कारवाई होणार आहे. ते सांगत आहेत की आम्हाला ३ महिन्यांत पैसे मिळतील. आम्हाला ईएमआय भरायचे आहेत. आम्ही आता ते कसे भरू." असा सवाल त्यांनी केला.
आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकला नोटीस बजावत पुढील सहा महिन्यांसाठी नवीन कर्ज देण्यास, नवीन ठेवी स्वीकारण्यास अथवा पैसे काढण्यास बंदी घातली आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या काही वर्षांत आर्थिक तोट्याचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात या बँकेला २२७.८ दशलक्ष रुपयांचा तोटा झाला. त्याआधीच्या वर्षी हा तोटा ३०७.५ दशलक्ष रुपयांचा होता.
आर्थिक निर्बंध म्हणजे बँकेचा परवाना रद्द केला आहे असा होत नाही. आरबीआय या बँकेच्या आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि परिस्थितीनुसार आवश्यक कारवाई केली जाईल, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.