मुंबई: खास कोकणवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड ही नवीन रेल्वे गाडी सुरु करण्यात आली आहे. या गाडीचा मोठ्या दणक्यात शुभारंभ झाला होता. मात्र, प्रत्यक्षात गाडी सुरू झाली नव्हती.
अखेर आज ८ सप्टेंबरपासून ही गाडी दररोज चालवण्यात येणार असून त्याचे आरक्षण ही आजपासून सुरू होत आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोड येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी उद्या ९ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू होणार आहे.
गेल्या ३ सप्टेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित या गाडीचा शुभारंभ करण्यात आला होता. यासाठी गाडीसाठी लोकप्रतिनिधी आणि कोकणवासियांकडून आग्रही मागणी करण्यात आली होती.
गाडी क्रमांक १५०८७ (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड एक्सप्रेस) आज ८सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येईल. तसेच गाडी क्रमांक १५०८८ (सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस) उद्या ९ सप्टेंबरपासून दररोज चालवण्यात येणार आहे.
आजपासून ही गाडी मुंबई सीएसएमटी येथून दररोज २३:५५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे १३:५० वाजता पोहोचेल तसेच (२१ ऑक्टोबर) पावसाळ्यानंतरच्या वेळापत्रकानुसार ती दुसऱ्या दिवशी १४:१५ वाजता पोहोचणार आहे.
तसेच कोकणातून मुंबईत येताना सावंतवाडी रोड येथून १७:०० वाजता गाडी सुटेल. आणि पावसाळ्यानंतर १७:२० वाजता सुटेल. मुंबईत दुसऱ्या दिवशी ०६:४० वाजता गाडी पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर या नवीन एक्स्प्रेसला थांबे देण्यात आले आहेत.
येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणारा गणपती उत्सव आणि त्यानंतर पुढे नवरात्री, महाशिवरात्री, होळी-धुळवड तसेच मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही गाडी अतिशय महत्वाची ठरणार आहे.