नवी मुंबई: नाशिक आणि पुणे येथून कोथिंबिरीची आवक घटल्याने किरकोळ बाजारात २०० ग्रॅम कोथिंबिरीची जुडी ९० रुपयांवर पोहोचली आहे. हीच जुडी घाऊक बाजारात मात्र ४० ते ५० रुपयांना मिळते.
एपीएमसीमध्ये भाज्यांची आवक प्रचंड घटली आहे. लहान मोठ्या २५० ते ३५० गाड्यांची आवक सध्या घाऊक बाजारात सुरु आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मुंबईतील ग्राहक बाजारात फिरकला नसल्याने व्यापाऱ्यांचा २५० ते ३०० गाडी शेतमाल विक्रीविना पडून राहिला होता. पालेभाज्या सडल्या आणि फेकून द्याव्या लागल्या.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आवक घटल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून भाज्यांचे दर ८० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. श्रावणात त्यात आणखी १५ ते २० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली.
जूनपासून १० ते १५ वेळा एपीएमसीमध्ये चढउतार झाले. टोमॅटो, मिरची, मेथी, मुळा, वाटाणा, फरसबी, वांगी, कारली, भेंडी, आले, शेवगा, गवार या भाज्यांचे दर आजही ६० ते १४० रुपये किलो आहेत.
मात्र दोन दिवसांपासून कोथिंबिरीने उचल घेत २०० ग्रॅम जुडीला ८० ते ९० रुपयांचा भाव घेतला. नाशिक आणि पुणे येथून सुमारे सव्वा लाख जुड्यांची आवक सरासरी होते. मात्र त्यात घट झाल्याने कोथिंबिर महागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारातील दर हे कार्यालयात बसून लिहिले जातात. त्यामुळे प्रत्यक्षात विक्री दर हे वेगळेच असल्याचे किरकोळ व्यापारी सांगतात.