मुंबई: सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल 35 रुपये लिटरने देऊ अशा घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या कालखंडात 12 वर्षापासून पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
11 दिवसातच पेट्रोल, डिझेलच्या किमती 8 रुपये प्रति लिटरने वाढवल्या आहेत. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून ती सरकारने तात्काळ मागे घ्यावी, आणि हाच अमृतकाळ का?असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या 12 वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती 38 टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती 62 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण-इस्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहीत आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 72 रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. याची आठवण सपकाळ यांनी करुन दिली.