CM Devendra Fadnavis On Ahilyanagar tension : रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण करण्यामागाील षडयंत्राचा शाेध घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अहिल्यानगर पोलिसांनी आंदोलन हिंसक झाल्यानंतर ३० जणांना ताब्यात घेतले आहे.
यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये तणाव निर्माण करण्यामागे काही षडयंत्र आहे का, हे आपल्याला पाहावे लागेल. समाजात तेढ कोण निर्माण करत आहे, हेही पाहणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडविण्याचा प्रयत्न झाला होता. आताही त्याच प्रकारे कोणी आपल्याला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे का?, असा सवाल करत प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार आहे, परंतु अशा प्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करणे चुकीचे आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून अहिल्यानगरमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाला. मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, त्यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. मात्र, सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी एका गटाने नगर-संभाजी महामार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सर्व आरोपींना अटक होत नाहीत, तोपर्यंत रास्ता रोको सोडणार नाही, अशी आक्रमक भूमिका या गटाने घेतली. जेव्हा हा जमाव शहराच्या दिशेने निघाला, पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या या गटाची आणि पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर लाठीचार्ज करून पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला.
सध्या अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. कुठल्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. नवरात्र उत्सव चालू असल्याने सर्वांनी शांतता बाळगावी, असेही आवाहन अहिल्यानगर पोलिसांनी केले आहे.