मुंबई: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींनंतर शुक्रवारी संध्याकाळपासून संकेतस्थळ पुन्हा सुरळीत झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून नोंदणी, अर्ज भरणे आणि लॉक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी आतापर्यंत तब्बल 11 लाख 96 हजार 764 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 9 लाख 52 हजार 663 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण केली असून 8 लाख 88 हजार 692 विद्यार्थ्यांनी ‘पार्ट-1 लॉक’ केले आहे. तसेच एकूण 8 लाख 82 हजार 293 विद्यार्थ्यांनी विविध कोट्यांतील लॉक प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई विभागात सर्वाधिक 2 लाख 56 हजार 533 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2 लाख 39 हजार 685 विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 1 लाख 92 हजार 997 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. नाशिकमध्ये 1 लाख 15 हजार 949, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 लाख 3 हजार 616, कोल्हापूरमध्ये 1 लाख 3 हजार 330, अमरावतीमध्ये 96 हजार 541 तर नागपूर विभागात 87 हजार 731 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अर्जाच्या भाग-2 मधील महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणींमागे सुरुवातीला फक्त दोन दिवसांची मुदत देण्यात आल्याने सर्व्हरवर प्रचंड ताण आल्याचे मत शिक्षण संचालनालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भाग-1 भरलेल्या नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी पसंतीक्रम भरण्यासाठी संकेतस्थळावर गर्दी केल्याने सर्व्हरचा वापर क्षमतेपेक्षा जास्त झाला आणि संपूर्ण प्रणाली कोलमडल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे पसंतीक्रम भरताना विद्यार्थी आणि पालक अधिक वेळ घेत असल्याने एक लॉग-इन सरासरी 20 मिनिटे सक्रिय राहत होते. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वापरकर्ते प्रणालीवर कायम राहिल्याने सर्व्हरवरील भार वाढत गेला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पसंतीक्रम भरण्यासाठी सुरुवातीला कमी मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच 25 मेपर्यंत मुदत दिली असती, तर सर्व्हरवर एवढा ताण आला नसता, असेही अधिकाऱ्यांचे मत आहे. तांत्रिक बिघाडानंतर आता अतिरिक्त सर्व्हरची जोड देण्यात आल्याने संकेतस्थळ तुलनेने सुरळीत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.