मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवासात अनेक हिंसक घटनांचे सत्र सुरू असताना चर्चगेट - बोरिवली लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीला बाहेर फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. या घटनेत बाहेर फेकलेल्या प्रवाशाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांचा सुरक्षित लोकल प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अंपगाच्या डब्यात किरकोळ वादातून गुरुवारी दुपारी १.२४ वाजता हा प्रकार घडला. शाब्दिक वादातून एका दिव्यांग व्यक्तीने एका प्रवाशाला धावत्या लोकलमधून वांद्रे ते माहिम दरम्यान खाली ढकलले असल्याचे प्लॅटफॉर्मवर गाडी येताच डब्यातील प्रवाशांनी पोलिसांना सांगितले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी वांद्रे आणि माहिम दरम्यान शोध घेत बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीचा शोध घेतला. तपासणीत ते ६२ वर्षीय दिव्यांग केजिटन पॉल डेनिस पिरिस होते. आरोपीने त्यांना बाहेर ढकलले होते. पॉल हे सांताक्रूझ पूर्व येथील रहिवाशी आहेत. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्याना गंभीर दुखापत झाली.
वांद्रे रेल्वे पोलिसानी त्यांना उपचारासाठी दुपारी २:४५ वाजता भाभा रुग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र तेथे त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कावळा हाकलताना धक्का लागल्याचा दावा
या प्रकरणात ४८ वर्षीय संशयित आरोपी अमजद सफरुद्दीन शेख याला ताब्यात घेतले आहे. डब्यात कावळा आल्याने त्याला हाकलताना आपला धक्का लागल्याचा दावा आरोपीने केला आहे. मात्र वांद्रे रेल्वे पोलिसांनी जीआरपी गुन्हा क्र. २०७/२६, कलम १०३(१) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस याप्रकरणी रधिक तपास करीत आहेत.
लोकलच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह
पश्चिम रेल्वे मार्गात जून महिन्यात धावत्या लोकल ट्रेनमध्ये पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. तर महिला फर्स्ट क्लास डब्यात सीटवरून वाद झाल्याने पेपर स्प्रेचा वापर झाल्याची घटना घडली होती. तसेच परळ - अंबरनाथ धावत्या लोकलमध्ये दोन गटात रक्तरंजित राडा ही झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून लोकलच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.