मुंबई : चेंबूरच्या सुभाषनगरमधील इमारत दुर्घटनेतील जखमी झालेल्या आणखी एका मजुराचा बुधवारी राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुणाधर रॉय (22) असे त्याचे नाव असून या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहचली आहे. अद्याप बांधकाम व्यावसायिक आदित्यराज याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सुभाषनगरमधील ही म्हाडाची इमारत क्र. 36 असून तिचा खासगी विकासकाच्या माध्यमातून पुनर्विकास सुरू आहे. शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास सहाव्या मजल्यावर परांंचीवर उभे राहून सहा मजूर प्लास्टरचे काम करत असताना ते खाली कोसळले. त्यात रामनजेनेल्लू देशपोगू (55) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गुणाधर रॉय (22), कुस रॉय (30), विजयकुमार मेवालाल मोर्या (35), संदीप रॉय (27), रमेश रॉय (25) हे चार मजूर गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी गुणाधर रॉय (22) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या इमारतीचे काम सुरू असताना यापूर्वीही दुर्घटना घडल्या आहेत. त्यानंतरही कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरवण्यात आली नव्हती, हे या दुर्घनेनंतर समोर आले आहे. मजुरांचा जीव धोक्यात घालून काम सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी मुख्य ठेकेदार मनीभाई भानजी पटेल (62), त्याचे काम पाहणारे सतीश मनीभाई पटेल (40), जितेश मनीभाई पटेल (36), साईट इंजिनियर रजनेश शामलाल चौरसिया (30) साईट सुपरवायझर सुभाष हनुमंता बगल (36), लेबर मुकादम बुधवा रतो राय (50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र बिल्डर आदित्यराज याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.