मुंबई: प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासोबत आयोजित ऑनलाईन आढावा बैठकीत दत्तात्रय भरणे सहभागी झाले होते.
शिवराजसिंह चौहान यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनाअंतर्गत महाराष्ट्राने ७५ टक्क्यांहून अधिक निधीचा प्रभावी वापर केल्याबद्दल राज्याचे विशेष कौतुक केले. तसेच, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर योजनेत ८१.७३ टक्के निधी खर्च झाल्याने महाराष्ट्र देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत केंद्र सरकारने ३३५ कोटींच्या निधीस मंजुरी दिली असून यास राज्य शासनाचा ४० टक्के पूरक हिस्सा २२३ कोटी मिळून एकूण ५५८ कोटींचा निधी राज्यातील कृषी विकासासाठी उपलब्ध झाला आहे.
या निधीतून सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विविध प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निधीमुळे कृषी विकास, पायाभूत सुविधा बळकटीकरण आणि शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांना अधिक गती मिळणार आहे, असे भरणे म्हणाले.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी फळे व भाजीपाला उत्पादनवाढीस चालना देण्याकरिता तीन वर्षांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक विकास कृषी अभियानांतर्गत ३७७ कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अतिरिक्त ५०० कोटींची तरतूद मंजूर करण्यात यावी, अशी विनंती केंद्र शासनाकडे केली आहे.- दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री