मुंबई: शाळा सुरू होण्याची लगबग सुरू आहे. बाजारात गणवेशासह शालेय साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मात्र जुन्याच गणवेशात शाळेच्या पहिल्या दिवशी व पुढील किमान महिनाभर शाळेत जावे लागणार आहे. पावसाळ्यात आवश्यक छत्री व रेनकोटही उशिराच मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांना गणवेशासह स्टेशनरी, छत्री, रेनकोट, व अन्य शालेय वस्तू मोफत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी मिळाली आहे. मात्र या वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. याचा मुंबई महापालिकेच्या शाळांतील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे.
मुंबई महापालिका दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करते. यामध्ये शालेय पुस्तकांसह दप्तर, छत्र्या, शूज, रेनकोट, पाण्याची बाटली, पेन्सिल, वह्या, गणवेश व अन्य साहित्याचा समावेश आहे. यावेळी ही पुढील दोन शैक्षणिक वर्षासाठी शालेय वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून या प्रस्तावाला स्थायी समितीत गेल्या आठवड्यातच मंजुरी देण्यात आली.
त्यामुळे या शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा विद्यार्थ्यांपर्यंत करण्यासाठी किमान कंत्राटदाराला महिनाभराचा कालावधी लागणार आहे. या महिनाभराच्या कालावधीत सर्वच मुलांना वस्तू पुरवणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशांमध्ये काही दिवस शाळेत यावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत वस्तू पुरवण्याचे कंत्राट २०२५ मध्ये संपल्याचे माहीत असतानाही पालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला. यात पूर्वी महाटेंडरद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार होती. मात्र पालिकेतील सत्ताधारी भाजपा शिवसेनेने जेम पोर्टलद्वारे शालेय वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
मात्र यात बराच कालावधी गेला. त्यामुळे शालेय वस्तू खरेदीचे प्रस्ताव जूनच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी मोफत वस्तू पुरवणे शक्य नसल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.