Harish Bhandirge Surprise Raid pudhari
मुंबई

Harish Bhandirge Surprise Raid: रात्री १२ वाजता वेशांतर करुन BMC आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी KEM रुग्णालयात धाड

Anirudha Sankpal

Harish Bhandirge Surprise Raid: मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातील रुग्णसेवेचा बोजवारा आणि प्रशासकीय अनागोंदी मध्यरात्री थेट समोर आली आहे. मुंबई महानगरपलिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली असता, आपत्कालीन विभागातील प्रचंड विलंब, डॉक्टरांची जागेवरील अनुपस्थिती आणि लोकप्रतिनिधींसह रुग्णांच्या नातेवाईकांशी केला जाणारा उद्धट संवाद अशा गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अध्यक्षांनी केली आहे.

​उपचारासाठी पाठवलेल्या एका रुग्णाला सकाळी ११:०० वाजता केईएम रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात आणले गेले होते. मात्र, तब्बल साडेनऊ ते दहा तासांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर रात्री १०:३० वाजता त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आपत्कालीन रुग्णाबाबत होणारा हा अक्षम्य विलंब अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी श्री.

हरिष भांदिर्गे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालयाच्या दूरध्वनीवरून "आरोग्य समिती अध्यक्ष असोत की इतर लोकप्रतिनिधी, कोणाचेही फोन स्वीकारायचे नाहीत आणि कोणतेही रेफरन्स घ्यायचे नाहीत," असा धक्कादायक प्रतिसाद देण्यात आला. लोकप्रतिनिधींशी असे वर्तन अत्यंत अशोभनीय असून रुग्णहिताला बाधा आणणारे आहे, असा थेट आरोप भांदिर्गे यांनी केला.

​दूरध्वनीवरील या प्रकारानंतर अध्यक्षांनी स्वतः रात्री 12 वाजता रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. कॅज्युअल्टी विभागात रुग्णाची प्राथमिक तपासणी होण्यासाठीच दोन-दोन तास लागत होते. तपासणी कक्षात असणे अपेक्षित असलेले डॉक्टर जागेवर नव्हते, तर ऑन-कॉल सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (AMO) यांना बोलावूनही ते बराच वेळ हजर झाले नाहीत.

वॉर्डमधील परिचारिका व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी "आम्ही वैयक्तिक मोबाईलवरील फोन घेत नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा फोन आम्ही घेत नाही" अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. रुग्णांच्या नातेवाईकांना वेळेवर माहिती देणे आणि सुसंवाद राखणे ही रुग्णालय प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असल्याचे अध्यक्षांनी यावेळी सुनावले.

​या पाहणी दरम्यान केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्याशी रात्री 1.30 वाजता चर्चा झाली असता, त्यांनी रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध डॉक्टरांवरील प्रचंड ताणाचा पाढा वाचला. त्यावर बोलताना श्री. हरिष भांदिर्गे यांनी स्पष्ट केले की, रुग्णांची संख्या वाढणे हे वास्तव असले तरी त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी कमी होत नाही. उलट अशा परिस्थितीत अधिक सक्षम नियोजन, पुरेसे मनुष्यबळ, प्रभावी व्यवस्थापन आणि उत्तरदायी नेतृत्व असणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा बाधित होता कामा नये.

​सर्वसामान्य नागरिकांचा मनपा रुग्णालयांवर विश्वास असून वेळेत व सन्मानपूर्वक उपचार मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे सांगत श्री. हरिष भांदिर्गे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

तसेच आपत्कालीन विभागाच्या कार्यपद्धतीचे तातडीने पुनर्मूल्यांकन करावे, आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, आणि रुग्ण मार्गदर्शन, संवाद व्यवस्था व प्रशासकीय उत्तरदायित्व अधिक सक्षम करावे, असे निर्देश दिले आहेत. महानगरपालिकेची रुग्णालये ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेवर, सन्मानाने आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची मूलभूत बांधिलकी आहे; यात कोणतीही कसूर सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT