मुंबई: बांद्रा कुर्ला संकुलमध्ये रिक्षावाल्यांची मोठ्या प्रमाणात लुटमारी सुरू असून यावर वाहतूक पोलिसांचे नियंत्रणच नाही. त्यामुळे जेथे ३० ते ४० रुपये भाडे होते तेथे १०० ते १५० रुपये घेतले जात आहे. विशेष म्हणजे यावर कोणी आवाजही उठवत नसल्यामुळे रिक्षावाल्यांची चांदी झाली आहे.
मुंबईत बांद्रा कुर्ला संकुल हे मोठे व्यावसायिक हब बनले आहे. अनेक बँकांसह सरकारी निमसरकारी व खाजगी कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी व सामान्य नागरिक कामानिमित्त येत असतात.
येथे येण्यासाठी कुर्ला व बांद्रा रेल्वे स्टेशन येथून बस सेवा असली तरी, त्यांची संख्या कमी प्रमाणात असल्यामुळे अनेक जण शेअर रिक्षा अथवा खाजगी रिक्षाने प्रवास करतात. परंतु रिक्षावाले याचा गैरफायदा घेत आहेत.
स्टेशनला एक तर रिक्षा मिळत नाही मिळाली तर, अव्वाच्या सव्वा भाडे सांगतात. संकुलमधून एखाद्या कार्यालयातून रिक्षाने निघाल्यास मेट्रो स्टेशनपर्यंत अनेकजण मनाला येईल ते भाडे घेतात.
मीटरने गेल्यास जेमतेम ३० ते ४० रुपये भाडे होते अशा ठिकाणी १५० रुपये आकारले जातात. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे कारण सांगून प्रवाशांकडून दाम दुप्पट पैसे घेतले जात आहेत.
बांद्रा स्टेशन ते संकुलपर्यंत शंभर ते दीडशे रुपये भाडे आकारले जाते. अनेक रिक्षावाल्यांनी कधी मीटर डाऊन केलेच नाहीत.
रिक्षावाल्यांचा हा मनमानी कारभार सुरू असतानाही वाहतूक पोलिसांकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परंतु याबाबत कोणी तक्रार करत नसल्यामुळे रिक्षावाल्यांवरही कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मीटर रिक्षा स्टॅन्ड आवश्यक
बांद्रा कुर्ला संकुल येथे प्रत्येक प्रमुख ठिकाणी कुर्ला, बांद्रा व मेट्रो स्टेशनसाठी मीटर रिक्षा स्टॅन्ड होणे आवश्यक आहे. त्याशिवाय बेस्टतर्फे जास्तीत जास्त मिनी बस सेवा सुरू होणे आवश्यक आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
अनेक कार्यालयाच्या खाजगी बस
बांद्रा-कुर्ला संकुलमधील अनेक मोठ्या कार्यालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी खाजगी बस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे अनेकदा प्रवासी मिळत नसल्यामुळे बसची संख्या वाढवता येत नसल्याचे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.