शशिकांत सावंत, ठाणे
राज्यात जिल्हा परिषदेच्या 12, पंचायत समितीच्या 125, महानगरपालिकांच्या 29 आणि नगरपालिका, नगरपरिषदा 264 अशा जवळपास तीन टप्प्यांतील निवडणुका गेल्या 2 महिन्यांत पार पडल्या. या निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी राजकीय गणिते जुळवून सत्ता प्रस्थापित करण्याचे सूत्र भाजपने अवलंबिले. त्यात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी भाजपला 60 टक्के स्वराज्य संस्थांवर स्वबळावर सत्ता आणता आली. साहजिकच भाजप सर्वत्र विन (विजयी) होत आहे; तर मित्र पक्षांची स्थिती काहीशी क्षीण झाल्याचे चित्र आहे.
ज्या मित्र पक्षांनी स्वबळाचा नारा दिला, त्यांनाही फारसे यश मिळाले नाही. पुण्यात राष्ट्रवादी आणि ठाण्यात शिवसेना पूर्वीपेक्षा क्षीण झाली; तर भाजप अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेत पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी जिंकू शकली. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे फारसे काही चालले नाही. म्हणूनच सातारासारख्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत तेथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. एकूणच महायुतीत बरं चाललं असलं तरी अंत:स्थ स्पर्धा मात्र कायम असल्याचेच पाहायला मिळते. सत्तारूढ पक्षाने सत्तेसाठी केलेल्या युती, आघाड्या आणि विरोधी पक्षाने जुळवलेली सत्ता समीकरणे याची चर्चा अखंड महाराष्ट्रभर झाली.
राज्यात 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काहींमध्ये त्रिशंकू स्थिती आहे. त्रिशंकू असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये रायगड, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकाच पक्षाला सत्ता मिळाली, अशा जिल्हा परिषदांमध्ये सिंधुदुर्ग भाजप, रत्नागिरी शिवसेना, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर भाजप यांचा समावेश आहे. तथापि, बाकीच्या जिल्हा परिषदांमध्ये सत्ता समीकरणे काय जुळतात, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली. चंद्रपूरमध्ये भाजप-शिवसेना (ठाकरे गट) अशी युती होऊन महापौर भाजप, उपमहापौर शिवसेना ठाकरे गटाचे झाले. अहिल्यानगरमध्ये भाजप- राष्ट्रवादी युतीची सत्ता आली. कोल्हापुरात जनसुराज्य-भाजप, सांगलीत भाजप-राष्ट्रवादी, परभणीत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्या युतीने मुस्लिम महापौर इकबाल सय्यद यांना महापौर केले. त्याची महाराष्ट्रभर चर्चा झाली. भाजपने एमआयएमशी युती केल्याचे नगरपरिषदांमध्ये पुढे आले होते. भिवंडी महापौरपदाची निवडणूक 17 रोजी होणार आहे.
सत्ताधारी पक्ष कुठल्या आघाड्यांशी सूत जुळवणार याची चर्चा सुरू आहे. शिंदे सेनेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सूत जुळवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का, याकडे लक्ष आहे. भिवंडी महापालिकेत 90 पैकी महाविकास आघाडी काँग्रेस 30, राष्ट्रवादी शप गट 12, समाजवादी पार्टी 6, असे खरे तर बहुमत आहे. मात्र, महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याने येथेही महायुतीचा महापौर बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील तिन्ही निवडणुकांमध्ये भाजप नंबर वन ठरला असून, महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकांतही आघाडी कायम.
12 पैकी 8 जिल्हा परिषदांमध्ये भाजप अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता. रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर यांचा समावेश.
29 पैकी 19 महापालिकांमध्ये भाजपचे वर्चस्व. मुंबई, मीरा-भाईंदर, पनवेल, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, छ. संभाजीनगर, नांदेड, अमरावती, सोलापूर, धुळे, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, जळगाव, अकोला, जालना, चंद्रपूर आदी ठिकाणी कमळ फुलले.
भाजप हा केवळ शहरी पक्ष अशी ओळख असताना, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधून ग्रामीण भागातही मजबूत पाळेमुळे रुजल्याचे चित्र.
शिवसेनेची विभागणीमुळे मोठी पिछेहाट; 12 पैकी रत्नागिरी वगळता एकाही जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता नाही.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पकड सैल झाल्याचे स्पष्ट संकेत. महायुतीचा सर्वत्र बोलबाला; मात्र महायुतीत भाजप अधिक बळकट, मित्रपक्ष तुलनेने मागे.
महाविकास आघाडीत अंतर्गत दुहीमुळे घसरण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा धोकादायक ठरल्याचे चित्र.
224 नगरपरिषदा, 12 जिल्हा परिषदा, 29 महापालिका आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 60% पेक्षा जास्त ठिकाणी भाजप स्वबळावर विजयी.
‘कुणाशीही युती करा, पण सत्ता मिळवा’ हा फॉर्म्युला भाजपने राज्यात यशस्वीरीत्या राबवला.