मुंबई: प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक प्रभावीपणे थांबवून त्यांना सुरक्षित, पारदर्शक आणि वाजवी दरात प्रवास करता यावा म्हणून राज्य सरकारने अधिकृत 'भारत टॅक्सी' सेवेची घोषणा केली होती. या सेवेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. यामुळे एकाच मोबाईल ॲपद्वारे प्रवाशांना कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी असे तिन्ही पर्याय उपलब्ध होणार आहेत.
भारत टॅक्सी ही सेवा केंद्र सरकारचे सहकार मंत्रालय आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. यासाठी 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड' या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. खासगी कंपन्यांच्या व्यावसायिक तुलनेत ही सेवा पूर्णपणे सहकारी संस्थेच्या माध्यमातून चालवली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळ येथे ‘भारत टॅक्सी’ सेवेचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीला तब्बल ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू असल्याचे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.
ॲप कसे डाऊनलोड कराल ?
अँड्रॉइड आणि आयफोन युजर्स आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून 'भारत टॅक्सी' हे मोबाईल ॲप सहज डाऊनलोड करू शकतात. हे ॲप मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.
चालक थेट मालक असणार
यात वाहन चालवणारे चालक हे केवळ नाममात्र कर्मचारी नसून ते या संस्थेचे थेट मालक असणार आहेत. यामुळे चालकांना त्यांच्या मेहनतीचा संपूर्ण आणि योग्य मोबदला मिळेल, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासाला गती मिळेल.
पहिल्या १.५ किलोमीटर प्रवासासाठी ३१ रुपये भाडे
भारत टॅक्सीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी आहे. यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या १.५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ३१ रुपये भाडे आकारले जाणार आहे. तर त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २१ रुपये दर असणार आहे. त्यामुळे अचानक वाढणाऱ्या भाड्याच्या त्रासापासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.