मुंबई : नरेश कदम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभेच्या पोटनिवडणुका लढण्याचे काँग्रेसने निश्चित केले असून, या निर्णयाला पक्षश्रेष्ठींनी गुरुवारी हिरवा कंदील दाखवला.
बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक 23 एप्रिलला आणि मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री बनल्या. तेव्हा त्या राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांनी या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांना आता विधानसभा किंवा विधान परिषदेच्या सदस्या व्हावे लागेल. त्यामुळे त्या बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचा पाठिंबा आहे. मात्र, काँग्रेसने बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा लढविण्याचे ठरवले आहे. त्याकरिता पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा शरद पवार गटाने लढवल्या होत्या. बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ही पोटनिवडणूक लढवत असल्याने शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसने या दोन्ही जागा लढविण्याचे ठरवले आहे. आघाडीत उद्धव ठाकरे गटाने अद्याप कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत भूमिका ठरविलेली नाही.
बारामतीची पोटनिवडणूक शरद पवार गट लढवणार नसला, तरी राहुरी पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याचे ठरत आहे. राहुरीत भाजपने दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. एकूणच बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही, असे स्पष्ट होत आहे.