मुंबई

Sanjay Raut | "बिनविरोध निवडणूक हा शेतकरी, कष्टकऱ्यांवरील अन्याय" : बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut on Baramati by election | राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut on Baramati by election

मुंबई : राज्यात राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील आमदारांचं दुर्दैवी निधन झाल्याने येथे पोटनिवडणुका होत आहेत. अजित पवारांसारखं नेतृत्व ज्या पद्धतीने काळाने हिरावून घेतलं, त्याच्यामुळे एक सहानुभूती आहे. आदर आहे; पण निवडणुका लढायच्याच नाहीत, बिनविरोध झाल्या पाहिजेत, हा अट्टाहास चुकीचा आहे. निवडणूक काळामध्ये मतदारांचा एक मोठा वर्ग असतो, ज्याला सरकारला मतदान करायचं नसतं. त्यांनी काय करायचं? सरकारविरोधात शेतकरी, कष्टकरी तरी चिडलेला आहे, संतप्त आहे, त्यांच्यावरती बिनविरोध निवडणुका म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्यापासून रोखणं आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

राहुरीचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर

राहुरी मतदारसंघाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. राहुरी ही जागा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती, त्यामुळे पहिला निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आज शरद पवार यांच्या पक्षाची यासंदर्भात बैठक आहे. आमच्या पक्षातर्फेही तिथे तीन उमेदवार इच्छुक आहेत. समन्वयाने निर्णय घेतला जाईल, मात्र प्राजक्त तनपुरे निवडणूक लढणार की नाही, यावर राष्ट्रवादीचा काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल." राहुरीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) प्राथमिक हक्क असला तरी, शिवसेनेकडेही सक्षम उमेदवार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार

काँग्रेसनेही या जागेवर दावा सांगत मुलाखती सुरू केल्या आहेत. यावर राऊत म्हणाले की, "प्रत्येक पक्षाला तयारी करण्याचा अधिकार आहे. राजकारण हे युद्धासारखे असते, कोणावर कधी जबाबदारी येईल सांगता येत नाही, त्यामुळे आम्हीही तयारी ठेवली आहे."

राजकारणात चर्चा होत असतात

बारामतीमधील राजकीय चर्चांवर स्पष्टीकरण देताना राऊत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. "राजकारणात चर्चा होत असतात, मात्र सुनेत्रा पवार या महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. त्या भाजप आणि अजित पवार गटाच्या संयुक्त उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. बिनविरोध निवडीचा अट्टाहास चुकीचा आहे, लोकशाहीत निवडणुका झाल्याच पाहिजेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

... तर त्यांना मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या वरचे आसन द्यावे लागेल

जैन मुनींनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून राऊत यांनी संताप व्यक्त केला. "अशा प्रकारची तुलना होत असताना व्यासपीठावरील मंत्र्यांनी विरोध करायला हवा होता. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना त्यांच्या भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? असा प्रश्न पडतो. जर त्यांनाच छत्रपती मानले जाणार असेल, तर मंत्रिमंडळात त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वरचे आसन द्यावे लागेल," अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले.

राजधानीचा निर्णय राज्याचा, केंद्राचा नाही

आंध्र प्रदेशच्या राजधानीवरून संसदेत झालेल्या घडामोडींवर राऊत यांनी केंद्राला इशारा दिला. "राज्याची राजधानी कोणती असावी, हा निर्णय राज्य सरकारचा असतो, केंद्राचा नाही. उद्या जर केंद्राने मुंबईबाबत असा काही कायदा आणण्याचा प्रयत्न केला, तर ते घातक ठरेल. सर्व राज्यांनी या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे," असेही संजय राऊत म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT