मुंबई: महात्मा गांधी मालिकेतील २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या सर्व चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्यात येणार आहेत, तसेच, येत्या १ जुलै २६ पासून नोटा स्वीकारण्याची अथवा बदलून घेण्याची सुविधा बँकांमधून बंद करण्यात आल्याचे वृत्त पसरले होते. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाचे परिपत्रक समाज माध्यमांवर फिरत होते. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती बँक ऑफ महाराष्ट्रने शनिवारी (दि. २७) दिली.
शनिवारी काही वृत्तपत्रांनी (पुढारी नव्हे) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) ९ जून २०२६ च्या आदेशाच्या आधारे हा निर्णय घेतल्याचा दावा केला होता. तसेच, आरबीआयने सर्व बँकांच्या प्रमुखांना उद्देशून असे परिपत्रक काढल्याचे वृत्त देण्यात आले होते. याशिवाय बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयांतर्गत परिपत्रक काढून क्षेत्रीय कार्यालयांना या आदेशाची माहिती कळविल्याचे बातमीत म्हटले होते.
बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या नावे प्रसिद्ध झालेला मजकूर आणि अंतर्गत परिपत्रक फेक असल्याचे दै. 'पुढारी'ला सांगितले. या फेक परिपत्रकात ३० जून २०२६ नंतर २००५ पूर्वी छापलेल्या १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याचे म्हटले होते. बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या फेसबुकवरील अधिकृत हँडलवर हे वृत्त फेक असल्याचे म्हटले आहे.