मुंबई: मे महिन्याच्या १७ तारखेपासून सुरू असलेल्या ‘अधिक मास’मुळे विवाहाचे शुभ मुहूर्त रखडले होते. मात्र १५ जूनपासून अधिक मास संपल्यामुळे विवाहाच्या शुभ मुहूर्ताची सुरुवात होणार आहे. असे असले तरी जून आणि जुलैमध्ये लग्नासाठी फक्त १२ शुभ मुहूर्त आले आहेत. त्यानंतर, पुढील चार महिने शुभ कार्यक्रम टाळले जातात, असे पंचांग शास्त्राचे म्हणणे आहे.
भारतीय पंचांगानुसार, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येची तारीख १४ जून रोजी दुपारी १२ : १९ पासून ते १५ जून रोजी सकाळी ०८:२३ पर्यंत होती. त्यामुळे तो दिवस अधिक मास समाप्तीचे प्रतीक आहे आणि १६ जून रोजी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सुरुवात होत आहे.
जून-जुलैमध्ये विवाहाचे शुभ मुहूर्त
विवाहासाठी पहिला शुभ मुहूर्त २१ जून रोजी आहे. तसेच जून महिन्यात लग्नासाठी ८ शुभ दिवस आहेत, तर जुलै महिन्यात फक्त ४ दिवसच शुभ मुहूर्त आले आहेत. जून महिन्यात २१ जून (रविवार), २२ जून (सोमवार), २३ जून (मंगळवार), २५ जून ( बुधवार), २६ जून (शुक्रवार), २७ जून (शनिवार), २९ जून (सोमवार ) आणि जुलै महिन्यात फक्त १ जुलै ( बुधवार), ६ जुलै ( सोमवार), ७ जुलै (मंगळवार), ११ जुलै ( शनिवार) असे शुभ मुहूर्त आहेत.
४ महिन्यांसाठी शुभ कार्य निषिद्ध?
वैदिक पंचांगानुसार, २५ जुलैपासून चातुर्मास सुरू होत असल्याने त्या दिवसापासून विवाहसारखे शुभ कार्य निषिद्ध आहेत. त्यामुळे विवाहसोहळ्यांसहित इतर शुभ समारंभ पार पाडले जात नाहीत, अशी लोकांची धारणा आहे.