

मुंबई: भाजपा मागाठाणे विधानसभेतर्फे रविवारी बोरिवली (पूर्व) येथील पाटीदार हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनात्मक बैठकीत शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे गटनेते आ. दरेकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला.
भाजपात काम करण्यासाठी प्रचंड वाव आहे. मागाठाणेत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. परिपक्व कार्यकर्ते आहेत. आपल्याला मागाठाणे विधानसभा क्षेत्रही शत प्रतिशत भाजपामय करायचे आहे, असा हुंकार प्रवीण दरेकर यांनी यावेळी भरला.
या बैठकीत शिवसेनेतील पदाधिकारी महेश शिंदे, हेमंत पांडे, ॲड. विक्रम सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील आदिवासी पाड्यातील अनेक तरुणांनी विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या विकासाकडे बघून आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, मुंबई भाजपा सचिव डॉ. योगेश दुबे, प्रभाग समिती अध्यक्ष व प्र. क्र. ३ चे नगरसेवक प्रकाश दरेकर, महामंत्री आप्पा बेलवलकर, महामंत्री निखिल व्यास, नगरसेविका निशा परुळेकर, नगरसेविका ॲड. सीमा शिंदे, एसआयआर संयोजक सुरेंद्र गुप्ता, उत्तर मुंबई उपाध्यक्ष सचिन शिरवडकर, उत्तर मुंबई सचिव ललित शुक्ला, रवी जुवळे, सुभाष येरूणकर, मागाठाणे विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर, मंडळ अध्यक्षा सोनाली नाखुरे, उत्तर मंडळच्या महिला मोर्चा अध्यक्षा प्रियांका रेडकर, दक्षिण मंडळच्या महिला मोर्चा अध्यक्षा वंदना म्हस्के यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. प्रवीण दरेकर आपल्या भाषणात म्हणाले की, आज कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी भाजपमध्ये येत आहेत. जे आपल्यापासून दूर गेले, त्यांना पश्चात्ताप झाला असून तेदेखील परत आले. दीर्घकाळ राजकारण करायचे असेल, तर भाजपाशिवाय चांगला दुसरा पक्ष असूच शकत नाही. ज्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व आहे, ज्या नेत्याने आपल्या पक्षाचे, देशाचे नाव जगाच्या पाठीवर मोठे केले.
या राज्याला देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व आहे. ज्यांनी मुंबईला आकार दिला. मुंबईसह महाराष्ट्र बदलतोय, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी कर्जमाफीही आता करण्यात आली. सर्व घटकांना सोबत घेऊन समाजाचे हित, लोकांचा विकास करणारा कुठला पक्ष असेल तर तो देशातील एकमेव पक्ष म्हणजे भाजप.
आदिवासी समाजालाही भाजपाचा अभिमान
दरेकर म्हणाले की, आदिवासी बांधवांनाही वाटते भाजपा हा पक्ष आमच्यासाठी आहे. या देशाचे सर्वोच्च असे राष्ट्रपती पद कधीच आदिवासी समाजाला दिले गेले नव्हते. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला आज देशाच्या सर्वोच्च पदी आहेत. आमचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाने केला हा अभिमान आदिवासी बांधव-भगिनींना आहे. त्यामुळेच राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील तरुणही आज भाजपकडे आकर्षित झाले.