मुंबई: अरबी समुद्रात यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 वेळा महाकाय लाटा उसळणार आहेत. या लाटांची उंची सुमारे साडेचार मीटर ते पावणे पाच मीटरपर्यंत असणार आहे. त्यामुळे या दिवशी मुंबईकरांसह पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
पावसाळ्यात अरबी समुद्राला मोठी भरती असते. त्यामुळे समुद्रातील पाणी मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया व अन्य चौपाट्यांवर धडकते. त्यामुळे पावसाळ्यात समुद्र किनारी फेरफटका मारणे, धोकादायक असते.
यासाठी मुंबई महापालिका वेळोवेळी सावधतेचा इशारा देते. यावेळी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात 24 वेळा समुद्राला मोठी भरती असणार आहे. सर्वाधिक 4.89 उंचीच्या लाटा 16 जुलैला उसळणार आहेत.
भरतीच्या काळात मुंबईकरांनी जीव धोक्यात घालून समुद्रकिनारी फेरफटका मारू नये, अशी विनंती केली धोक्याचे फलकही लावण्यात येणार आहेत. जीव रक्षकांचीही नेमणूक करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.