वाशी : वाशीतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये मिरचीची आवक घटली असून मागणी मात्र कायम आहे. त्यामुळे बाजारात मिरचीच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गुढीपाडवानंतर जत्रोत्सव, लग्न सराई तसेच आगामी पावसाळा लक्षात घेता घराघरांत मसाला तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक चवीचा आस्वाद वर्षभर मिळावा यासाठी महिला सध्या मसाला बनविण्यात व्यस्त झाल्या आहेत. मात्र, मिरच्यांचे दर गेल्यावर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाढले आहेत. लाल मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, हळद अशा विविध मसाल्याच्या पदार्थांची खरेदी बाजारातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
मागील वर्षी याच हंगामात 15 ते 20 गाडी आवक होती. सध्या मिरचीची आवक दररोज 10 ते 12 गाडी आहे. तर 7 ते 8 गाडी मिरच्यांचा माल दररोज मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये जात आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, डिसेंबर महिन्यात कर्नाटकमधून मिरचीची आवक चालू होते; परंतु पावसामुळे यंदा थोडा विलंब झाला असून त्यामुळे मिरची महाग झाल्याची माहिती बॉम्बे मुडी बाजार संघटनेचे माजी अध्यक्ष अमरीश बारोट यांनी दिली.
वाशीतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये तेजा, बेडगी, काश्मिरी या मसाल्याच्या मिरच्यांचे दर 10 टक्क्यांनी वाढले असून तेजा लवंगी मिरची 230-260, बेडगी मिरची 400-450, काश्मिरी मिरची 650-800, तर संकेश्वरी मिरची 900-1200 रुपये किलो विकली जात आहे.