Anjali Damania Emotional: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज भोंदू बाबा अशोक खरात आणि राजकीय नेत्यांच्या संबंधाबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्राकर परिषदेत त्यांनी राजकीय नेत्यांवर देखील कारवाई केल्याशिवाय असले प्रकार बंद होणार नाहीत असं वक्तव्य केलं. त्या बोलताना भावूक देखील झाल्या. अंजली दमानिया यांच्याकडे अशोक खरातचे सीडीआर आले कसे अशी शंका शिवसेनेच्या प्रवक्त्या अंधारे यांनी व्यक्त केली होती. यावेळी मी हे सीडीआर कसे मिळवले अन् माहिती कशी गोळा केली हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
आजच्या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्यांनी अशोक खरातला एका उपमुख्यमंत्र्याने एवढे कॉल का केले याबाबत स्पष्टीकर द्यावं अशी मागणी केली. यावेळी बोलताना अंजली दमानिया यांना भावना अनावर झाल्या.
त्या म्हणाल्या, 'एक उपमुख्यमंत्री खरातांशी काय बोलले. आम्ही हे विचारणार नाही का? मी जेवढे कॉल केले होते ते टॉप ३० कॉल फोनवर शोधले. माझे डोळे झिजले.' यानंतर भावना अनावर झालेल्या दमानिया यांनी पाण्याचा घोट घेतला अन् त्यांच्यावर टीका करणाऱ्यांबद्दल वक्तव्य केलं.
अंजली दमानिया म्हणाल्या 'तोंड आहे म्हणून वाटेल ते बोलत सुटायचं. पक्षाचं छत्र न घेता लढून बघा एकदा चॅलेंज आहे माझं तुम्हाला. यामधून एक स्पष्ट झालं की मी जे करतेय ते योग्य करतेय. जेव्हा सगळ्याच पक्षाची मंडळी तुमच्याबद्दल बोलायला लागतात ते व्हा समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत.'