मालाड: मालाड पश्चिमेतील मालवणी गावदेवी मंदिर रस्त्यावर खुल्या गटारांचे साम्राज्य निर्माण झाल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मॅनहोलमध्ये पडून एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही महापालिका प्रशासनाने यापासून कोणताही बोध घेतलेला दिसत नाही.
मालवणीतील गावदेवी रोडवरील अनेक गटारांच्या लोखंडी जाळ्या तुटलेल्या असून काही ठिकाणी त्या पूर्णपणे निखळल्या आहेत. त्यामुळे ही गटारे सध्या धोकादायक अवस्थेत आहेत.
या समस्येबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. तसेच महापालिकेच्या हेल्पलाईनवरही तक्रारी नोंदवल्या आहेत.
मात्र, महापालिकेच्या पी उत्तर विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी करून वेळ काढला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, दिवसेंदिवस ही खुली गटारे अधिक धोकादायक बनत आहेत.
या गटारांत अनेकदा दुचाकींची चाके अडकून किरकोळ अपघात घडले आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास मोठी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका प्रशासन एका मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन धोकादायक गटारे बंद करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चिमुकल्यांच्या जीवाला धोका
गावदेवी रोड, राठोडी, खारोडी, अंबोजवाडी परिसरातील अनेक रस्त्यांवर व वस्त्यांमध्ये उघडी गटारे आहेत. परिणामी, येथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
एखाद्या चिमुकल्याचा या खुल्या गटारात पडून बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. साधारण दीड महिन्यापूर्वी दुचाकीसह महिलास्वार अंबोज वाडीतील गटारात पडली होती.
आम्ही या गटारावरील झाकणे बसवण्यासाठी महापालिका पी उत्तर विभागातील संबंधित खाते आणि अधिकाऱ्यांशी वेळो वेळी पत्रव्यवहार करून लोखंडी झाकणे, जाळ्या बसवण्याची विनंती केली. तसेच याबाबत मनपा आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त पी उत्तर विभाग यांना लेखी तक्रारी केल्या तसेच खुल्या गटारावर तातडीने झाकणे बसवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. मात्र पालिकेच्या डोक्यात काही शिरत नाही.-सम्राट बागुल, अध्यक्ष, शिवसम्राट फौउंडेशन