जरंडेश्वर साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींची भागीदारी आहे, असा आरोप करत बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून अजित पवारांनी अवैध संपती जमा केली आहे;मग अजित पवारांनी आपल्या बहिणींशीच बेईनामी केली का, असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ( Kirit somaiya vs Ajit Pawar ) आज केला.
सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या. यावेळी राजकीय आकसातून माझ्या नातेवाईकांवर कारवाई केली जात आहे, असा दावा अजित पवारांनी केला होता. मात्र पुराव्यांच्या आधारेच ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा सोमय्यांनी केला.
अजित पवार यांच्या बहिणी विणा पाटील, निता पाटील आणि विजया पाटील यांची जरंडेश्वर साखर कारखान्यांत भागीदारी आहे; मग अजित पवारांनी बेनामी संपत्ती बहिणीच्या नावावर जमा केली आहे का. अजित पवारांनी आपल्या बहिणींशी बेईनामी केली आहे का, शरद पवारांना ही बेईनामी मान्य आहे का, असा सवालही साेमय्यांनी केला.
राज्यातील गृहमंत्री आणि मुंबई पोलिस आयुक्तच खंडणी घेतात;मग जनतेने कोणाकडे न्याय मागायचा. यामुळेच मी आता भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच जरंडेश्वर कारखान्या संदर्भातील पुरावे उद्या सक्तवसुली संचालनालय ( ईडी ) कार्यालयात सादर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळातील ठाकरे सरकारच्या आर्थिक घोटाळ्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कारोना रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोपही सोमय्या यांनी या वेळी केला.