मुंबई: अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघाताचा तपास ‘एएआयबी’कडून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय संस्था यांचाही यात समावेश आहे. राज्य सीआयडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
विमान अपघाताबाबत ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल जानेवारी महिन्यापूर्वी येईल. त्यानंतरच सीबीआय या दुर्घटनेचा तपास हाती घेऊ शकेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य तसेच केंद्र सरकारचे या प्रकरणावर पूर्ण लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा दोन प्रकारे तपास चालला आहे. एक आपले सीआयडी करते आहे. दुसरे ‘एएआयबी’ करते आहे.
आपण सीबीआयला विनंती केली होती; पण सीबीआयने तपास का हाती घेतला नाही, अशी विचारणा झाली. मात्र, ‘एएआयबी’चा अंतिम अहवाल आल्याशिवाय आपण तपास सुरू करू शकत नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.
पायलट सुमीत कपूर यांच्याबाबत आधी शंका होती; पण त्यांचे बँक खाते आदी सर्व आर्थिक व्यवहार तपासले; पण त्यात काही संशयास्पद आढळले नाही. ‘एएआयबी’चा प्राथमिक अहवाल आला आहे. आपण आज केंद्र सरकारशी चर्चा केली. मंत्री महोदयांनाही विचारले असून साधारणपणे जानेवारीपूर्वी अंतिम अहवाल येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
या प्रकरणी एफआयआर का दाखल नाही, अशी विचारणा सातत्याने होते; पण एफआयआर दाखल केला की दोषी कोण, हे ठरवावे लागते. अहवाल येत नाही तोपर्यंत काही ठरवू शकत नाही. कोणालाही दोषी ठरवायचे असेल तर अंतिम अहवाल यावाच लागेल. भावना महत्त्वाचीच आहे; पण कायदा भावनेने चालत नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.