air pollution File Photo
मुंबई

Mumbai Air Pollution| वायू प्रदूषण मुंबईकरांसाठी ‘सायलेंट किलर’

Air Pollution| हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित आजार या प्रदूषणामुळे बळावत आहेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबईसारख्या महानगरात विविध कारणांमुळे वाढलेले वायू प्रदूषण नागरिकांसाठी ‘सायलेंट किलर’ बनत आहे. हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित आजार या प्रदूषणामुळे बळावत चालल्याचे एका अभ्यासात पुढे आले आहे.

वाढते बांधकाम, वृक्षतोड, औद्योगिकीकरण यांसारख्या कारणांनी जगभरात वायू प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून पुढे चालले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये या वायू प्रदूषणाने जगभरात 42 लाख लोकांचा बळी घेतला. यातील 89 टक्के मृत्यू दारिद्य्र रेषेखालील आणि मध्यमवर्गीय गटातील देशांमध्ये झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे, वायू प्रदूषण हे मृत्यूस कारणीभूत ठरणारे जगातील दुसरे मोठे कारण बनले आहे. तसेच पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूबाबतही वायू प्रदूषणाचा धोका सर्वाधिक आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात आशिया खंडातील संशोधकांनी एकत्र येऊन केलेल्या अभ्यासात वायू प्रदूषणाचे जीवघेणे धोके

अधोरेखित करण्यात आले आहेत. मुंबईत हेलियस सेक्सेरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ या संस्थेने ‘मुंबई कोहोर्ट स्टडी’ या समूहा अंतर्गत या संबंधीचे संशोधन केले. या संशोधनाचा आधार घेऊन आशिया खंडातील इतर संशोधकांनी आपले निष्कर्ष काढले. संशोधनावरील प्रबंध एल्सविअर या जागतिक पातळीवरील पर्यावरणविषयक जून 2024 च्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे.

‘मुंबई कोहोर्ट स्टडी’

‘मुंबई कोहोर्ट स्टडी’च्या संशोधकांनी पीएम 2.5 या अत्यंत धोकादायक अशा धूलीकणावर अभ्यास केला. हा धूलीकण 2.5 मायक्रोमीटर इतक्या सूक्ष्म व्यासाचा किंवा त्याहूनही लहान असतो. साधारणपणे मानवी केसाच्या तीस पटीने तो लहान भरतो. या अत्यंत सूक्ष्म अशा आकारामुळे तो सहजगत्या श्वासावाटे मानवी शरीरात जातो. फुप्फुसात खोलवरपणे रूततो. त्यानंतर नसांमध्ये प्रवेश करून रक्तात जातो. त्यामुळे अत्यंत गंभीर असे आजार उद्भवू शकतात, असा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे.

धूलीकणांबाबत संशोधकांनी केलेल्या अभ्यासावेळी उपग्रहांद्वारे प्राप्त झालेली माहिती, प्रत्यक्ष जनमानसात जाऊन टिपलेली निरीक्षणे, आरोग्याचे वेेगवेगळे निष्कर्ष यांचा आधार घेण्यात आला. पीएम 2.5 हे धूलीकण मुंबईमध्ये दहा लाखांमागे 34 इतके आढळले. जागतिक आरोग्य संघटनेने 2005 मध्ये निश्चित केलेल्या हवेच्या गुणवत्तेपेक्षा हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. ते दहा लाखांमागे 25 इतके निश्चित करण्यात आले होते.

पीएम 2.5 हे धूलीकण मुंबईमध्ये दहा लाखांमागे 34 इतके आढळले

1991 ते 2003 या दरम्यान मुंबईतील हवेत आढळणारे हे धूलीकण दहा लाखांमागे 34 इतके नोंदवले गेले होते. वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये या काळात लक्षणीय अशी वाढ दिसून आली. आजच्या घडीला मुंबईमध्ये शहरीकरणाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित बनली आहे.

जून 2024 मध्ये पीएम 2.5 हे धूलीकण दहा लाखांमागे तब्बल 80 इतके नोंदवले गेले. जागतिक आरोग्य संघटनेच्या 2021 मध्ये निश्चित केलेल्या मानकांनुसार, हे प्रमाण दहा लाखांमागे केवळ 15 इतके आहे. म्हणजेच मुुंबईत हवेतील प्रदूषण पातळीपेक्षा पाच टक्क्यांनी वाढलेले आहे. मुंबईकरांचे आरोग्य जपायचे असेल तर हे धूलीकण हवेतून कमी करणे हाच पर्याय आता शिल्लक राहिला आहे.

दिल्लीचे वायू प्रदूषण

दिल्ली हे देशातील सर्वाधिक वायू प्रदूषित शहर बनले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत असलेले हे शहर वायू प्रदूषणाने अक्षरश: काळवंडले आहे. या शहराने मुंबईची वायू प्रदूषणाची पातळी केव्हाच ओलांडली आहे. हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये प्रदूषणाची पातळी पीएम 2.5 च्या भाषेत मोजायची झाली तर ती 10 लाखांमागे तब्बल 150 इतकी भरते. वाहनांमधून होणारे प्रदूषण, औद्योगिक वसाहतींतून होणारे प्रदूषण तसेच शेजारील राज्यांमधून शेतातील तणांना आगी लावल्यामुळे होणारे प्रदूषण दिल्लीच्या जीवावर उठले आहे. एकूणच देशातील दोन महत्त्वाची शहरे अत्यंत प्रदूषित झाली असून, येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हेलियस सेक्सेरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. प्रकाश गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई समूहाने केलेल्या अभ्यासामध्ये तंबाखूच्या सेवनाने होणारे मृत्यू आणि आरोग्यावर होणारे परिणाम पुढे आणले आहेत. त्याचबरोबर आरोग्यावर होणारे इतर धोकादायक परिणामही या समूहाने अभ्यासले आहेत. त्यासाठी उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणाचा आधार घेतला आहे. मुंबईच्या वायू प्रदूषणासंदर्भात या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष नमूद करण्यात आले आहेत.

पीएम 2.5 या धूलीकणाची पातळी मुंबईत अत्यंत धोकादायक स्थितीत

हेलियस सेक्सेरिया इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थचे संचालक डॉ. मंगेश पेडणेकर यांनी मुंबईच्या धोकादायक वायू प्रदूषणावर तत्काळ उपाययोजना करायला हव्यात, असे म्हटले आहे. पीएम 2.5 या धूलीकणाची पातळी मुंबईत अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. त्यामुळे हृदयविकार आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. सरकार पातळीवरून या विषयाकडे अत्यंत गांभिर्याने पाहायला हवे, असे डॉ. पेडणेकर म्हणतात.

  • सर्व प्रकारचे मृत्यू

    पीएम 2.5 या धूलीकणामुळे सर्व प्रकारच्या मृत्यूमध्ये पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आढळली.

  • अपघाताशिवाय झालेले मृत्यू

    या प्रकारात हे धूलीकण 14 टक्क्यांहून अधिक मृत्यूस कारणीभूत ठरतात, असे हे संशोधन म्हणते.

  • हृदयाशी संबंधित आजार

    या धूलीकणांमुळे हृदयाशी संबंधित असलेल्या आजारांमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झालेली आढळली.

  • फुप्फुसाचा कर्करोग

    ज्या लोकांमध्ये हे धूलीकण आढळले त्यांना 73 टक्क्यांहून अधिक फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका आढळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT