मुंबई : मंदिर की मस्जिद, भगवा की हिरवा, हलाल की झटका हे विषय घेणाऱ्या लोकांनी आज विधानसभेत एआयसारखा नवा विषय सभागृहात मांडला, ही कौतुकास्पद बाब असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
एआयचा कृषी क्षेत्रातील वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी राज्य सरकारने लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा एक टास्क फोर्स तयार करावा, जेणेकरून निसर्गाचा अंदाज बांधून शेतीचे नियोजन करता येईल. शेतीला अधिक प्रगत करणे सोपे होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.
एआयच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाच्या वतीने शनिवारी विधानसभेत नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाच्या वतीने चर्चेचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्ला चढवला. बिबट्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर यावरूनही त्यांनी कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी बिबट्यांना नियंत्रित करण्यासाठी काय करणार? कोणती ठोस उपाययोजना करणार ते सांगावे.
आम्हाला तुमच्याकडून काही नको, बिबटे तेवढे आवरा, तुमचे बिबटेही आवरा! पुढे तुमचे बिबटे म्हणजे सरकारचे नाहीतर जंगलातून बाहेर पडलेले बिबटे आवरा, असे सांगत त्यांनी सरकारला चिमटा काढला. वनविभाग याबाबत काहीही कारवाई करीत नाही.त्यांना पिंजरा लावण्यासाठी माणसांवर हल्ला होणे आवश्यक आहे का?.त्यामुळे बिबटे जेरबंद करण्यासाठी सर्वत्र मोहीम राबवा आणि पिंजरे बसवा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.