कृष्णा जाधव
“अहिंसा” हे तत्त्व समग्र अष्टांगयोगशास्त्राचा पाया आहे. एकूणच मानवांसह सृष्टीचे कल्याण “अहिंसा” या एकाच तत्त्वावर अवलंबून आहे. जोपर्यंत स्वतः प्रती कायिक-वाचिक-मानसिक आपण “अहिंसा” तत्त्वाचं पालन करणार नाही, तोपर्यंत आम्ही “सत्य” या तत्त्वाला स्पर्शही करू शकणार नाहीत. सत्य हे कटू नसतं तर ते मृदू, मुलायम, शीतल, मधूर असते, शिवाय त्यात फसवेपणाचा आणि दाहकतेचा अजिबात अंशही नसतो. अशी “सत्याची” व्याख्या माऊली करतात. याविषयीचं चिंतन आपण गतलेखात केले. आजच्या लेखात पुढील सद्गुणांचा मागोवा घेऊ यात
॥ श्री ॥
अहिंसा आणि सत्य या दोन तत्त्वांच आपण शक्य तितक्या विस्तृत प्रमाणात चिंतन केले. माऊलींनी सांगितलेल्या पुढील सद्गुणांचं आपण त्रोटक चिंतन करुयात.
1) अक्रोध :- क्रोध हा तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनात सतत जवळ असणारा “शत्रू” पण त्याचे आपलं सख्य मित्रत्वासारखं असतं. कारण तो आपल्या अंतःकरणात एवढ्या सहज व जलद गतीने प्रवेश करतो जसा आपला मित्र प्रवेशावा. विशेष म्हणजे जगातील सर्वदूर पसरलेले तत्त्वज्ञान विचार “क्रोधास” शत्रू मानतात. तरीही जगातील सर्वत्र राहणारी मानवजात “क्रोधास” सहजासहजी स्वीकारते, हे अहो आश्चर्य. क्रोधास जीवनातून पळवून लावण्यासाठी “अक्रोध” संस्कार हेतूपुरस्सर शिक्षणातून करावेच लागतील. माऊली अक्रोध व्याख्या पुढीलप्रमाणे करतात - “ क्रोध निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी “क्रोध” निर्माण होत नाही, अशा अवस्थेस “अक्रोध” म्हणतात. माऊली व्याख्येतील अक्रोधाबाबत असलेला निग्रह महत्त्वाचा वाटतो. हेतूपुरस्सरपणे मनावर केलेला संस्कार “अक्रोध” निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. ज्याप्रमाणे क्रोध सहज उत्पन्न होतो अगदी त्याचप्रमाणे प्रयत्नपूर्वक “अक्रोध” निर्माण व्हावा लागेल एवढी साधना करावी लागेल. “अक्रोध” प्राप्तीसाठी ज्याप्रमाणे दगडावर पाणी घातल्याने अंकुर फुटत नाही, कांजी घुसळून लोणी निघत नाही, राखेत कितीही तूप ओतले तर अग्नी प्रज्वलीत होत नाही त्याप्रमाणे क्रोध निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही “क्रोध” निर्माण होणारच नाही, अशी प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेली अवस्था “अक्रोध”. “अक्रोध” अवस्था अहिंसा आणि सत्य ही दोन तत्त्व प्रथम अंगीकारली तरच प्राप्त होऊ शकते. अक्रोधामुळे मानवी जीवन शांततेचा अथांग महासागर होईल हे निःसंशय सत्य.
2) त्याग :- त्याग हा सहज असावा. त्यातील सोडून देण्याची वृत्ती अत्यंत स्वाभाविक असावी अशी त्यागाची व्याख्या करताना माऊली “त्याग” बुुद्धीवंतांनी करावा, असे म्हणतात-कारण बुद्धीवंत जे स्वतःला समजतात त्यांच्यातील “अहंकार” सतत जागृत असून तो “फणा” काढून बसलेला असतो.
तेवी बुद्धीमंती देही | अहंता सांडूनी पाहीं|
सांडिजे अशेषही | संसारजात ॥
“अहंकाराचा” त्याग करणं त्यातच सर्व आले. अहंकार जेवढा सहजासहजी सोडता येईल तेवढ्या संसारातील सर्व बाबी सहजासहजी सोडून देता येतील. माऊलींना बुद्धीवंतांची जास्त काळजी वाटतेय, कारण ज्ञानीयांचा घात हा “अहंकार” करण्यासाठी नेहमी, सदैव तत्पर असतो.
त्याग कसा असावा यासाठी माऊली फार सुंदर दृष्टांत देतात - मातीचा त्याग केला असता “घटाचा” त्याग आपोआप. तंतूचा त्याग केला असता वस्त्राचा आपोआप, बीजाचा त्याग केला असत्ता वृक्षाचा आपोआप, तळ्यातील पाणी आटल्यावर “तरंग” आपोआप नष्ट होतात. त्याग या सद्गुणांतील सहजता ही खूप महत्त्वाची आहे; किंबहुना “सहजता” हाच त्यागाचा मानबिंदू. त्यागातील सहजता हाच खरा “अलंकार” ज्यानं त्यागाचं महत्त्व अधिक ठसठसीत दिसतं. सारांश माऊलींना हेच सांगायचे आहे की “त्याग” हा गाजावाजा करून नव्हे तर सहज करावा, त्याचा “आवाज” होता कामा नये.
3) शांती : सद्गुणांची उतरंड लावताना किती अभ्यासपूर्ण रचना केलेली आहे. अचानक “शांती” प्राप्त करूयात अस म्हटलं तर चालत नाही तर त्याला क्रमानच यावं लागते. अहिंसा-सत्य-अक्रोध-त्याग आणि त्यानंतरच “शांती” ही अवस्था. अगोदरचे सद्गुण अंगी बाळगल्या शिवाय “शांती” हे तत्त्व अंगीकारणं केवळ अशक्य आहे. संपूर्ण अहंकाराचा त्याग हाच शांतीकडे घेवून जातो. ज्ञानीयांना त्यामुळेच माऊली त्यागांचं आवाहन करतात. शांती या सद्गुणांची व्याख्या फार सुंदरपणे करताना माऊली म्हणतात.
तरी गीळोनी ज्ञेयातें | ज्ञाता ज्ञानही माघौतें|
हारपें निरूते| ते शांती पै गा ॥
ज्ञाता-ज्ञान-ज्ञेय ही त्रीपुटी ज्या ठिकाणी नाहिशी होते ती ब्रह्मरूप अवस्था म्हणजे “शांती.” अनुभव, आकलन आणि सत्य यांचा परस्परसंबंध समजावण्यासाठी ही त्रयी महत्त्वाची मानली जाते.
अ) ज्ञाता (जाणणारा) :- ज्याला ज्ञान प्राप्त होते तो ज्ञाता. तो म्हणजे साक्षी चैतन्य. देह-इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या सहाय्याने जो जाणतो तो जीव. परंतु वेदांतानुसार खरा ज्ञाता हा शुद्ध आत्मा आहे. जो साक्षीस्वरूप आहे. उदा:- मी फुल पाहतो - यातील “मी” म्हणजे ज्ञाता.
ब) ज्ञेय (जाणण्याजोगे):- जे जाणले जाते ते ज्ञेय. बाह्य वस्तू (नदी, डोंगर, सृष्टी), अंतर्गत अवस्था (आनंद, दुःख, भाव-भावना), सूक्ष्म तत्त्वे- (धर्म, ईश्वर)
क) ज्ञान (जाणण्याची प्रक्रिया) :- ज्ञाता आणि ज्ञेय यांना जोडणारा दुवा म्हणजे ज्ञान. इंद्रियज्ञान, अनुमान, तर्क, प्रत्यक्ष अनुभूती. उदा :- मी आंबा खातो- या वाक्यामधील मी- ज्ञाता, आंबा-ज्ञेय, खातो (चव)- ज्ञान.
समाधी साधनेमध्ये “मी” आणि “अनुभव” यामधील भेद नाहीसा होतो - हीच त्रिपुटीची समाप्ती.
सुरुवातीस त्रिपुटी असते (अज्ञान अवस्था), साधनेने ज्ञान शुद्ध होते, आत्मसाक्षात्कारात त्रीपुटी लय पावते. यालाच त्रिपुटी रहीत “अवस्था” म्हणतात. प्रलयकाळात पृथ्वीवर महासागरांना प्रचंड उधाण येऊ न जेव्हा प्रचंड महापूर येतो तेव्हा जमिनीवरील नदी, नाले, ओढे, प्रवाह, तलाव, तळे, समुद्र, महासागर हा भेद उरत नाही. सर्वत्र पाणीच पाणी. सर्वांच अस्तित्व समाप्त.
तैसी ज्ञेया देता मिठी| ज्ञातृत्वही पडे पोटी|
मग उरे तेंचि किरीटी| शांतीचे रूप ॥
शांतीचे अथांग स्वरूप दर्शन माऊली तुम्हा आम्हाला दाखवत नि:शब्द करतात. जगाच्या कल्याणासाठी झटणारे संत परमोच्च शांती तत्त्वाशी एकरूप झालेले असतात. हा समाज, परिसर, परिवार, निसर्ग, देश, परदेश, जग, विश्व, हा आसमंत, अवघे ब्रह्मांड ज्यांच्याशी “ऐक्य” याच मद्भावाने एकरूप झालेले असते. तेच संत शांतीब्रह्मस्वरूप असतात. माऊलींचा अभंग मला या ठिकाणी आठवतो.
समाधी साधन संजीवन नाम|
शांती, दया सम सर्वांभूती ॥
आजच्या लेखात आपण अक्रोध, त्याग आणि शांती या सद्गुणांचं चिंतन केलं. पुढील लेखात आणखी सद्गुण संपत्ती सोहळा साजरा करुयात. - रामकृष्ण हरी