Varun Sardesai Sunil Shinde may join shiv sena eknath shinde
मुंबई : विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांना आपल्या शिवसेनेत खेचून थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद बहाल करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला धक्का सौम्य ठरावा असे आणखी मोठे धक्के येत्या काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याची चिन्हे आहेत. अहिरांच्या धक्क्याचा अर्थ लावला जाण्यापूर्वीच खुद्द ठाकरे कुटुंबातील आमदार वरुण सरदेसाई ठाकरेदेखील येत्या काळात शिंदे सेनेत दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एवढेच नव्हे तर, आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी मतदारसंघ सोडणारे कट्टर शिवसैनिक सुनील शिंदेही शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत.
ही बातमी समोर येताच ठाकरे गटातून इन्कार येतील, खुद्द सरदेसाई देखील हे वृत्त फेटाळतील. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ऑपरेशन टायगरचा जो आराखडा तयार केला, त्यात आमदार वरुण सरदेसाई हे सध्या वांद्रयाच्या खेरवाडी मतदारसंघातील आमदार असले तरी मतदारसंघ पुनर्रचनेत संभाव्य डोंबिवली मतदार संघातून ते शिंदे सेनेच्या तिकिटावर लढू शकतात. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या भौगोलिक रचनेत व जागांच्या संख्येत महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे.
या बदलात डोंबिवली हा नवीन विधानसभा मतदार संघ निर्माण केला जाईल, असा विश्वास वरुण सरदेसाई यांना दिला जात असल्याचे या सूत्रांनी सांगितले. सरदेसाईंशी शिंदे सेनेची सतत चर्चा सुरू आहे. ठाकरे सेनेत सतत फूट पडत असल्याने मुंबईत आता ठाकरे सेनेची राजकीय ताकद कमी होत आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा माहीम विधानसभा मतदार संघातून विजयी होऊ शकत नाही, असे वरुण यांना समजवण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
अहिर यांनी ठाकरे सेना का सोडली ?
सचिन अहिर हे विधानसभेतून विधानपरिषदेवर गेले होते. ७ जुलै २०२८ रोजी त्यांच्या सदस्यत्वाची मुदत संपणार आहे. आता ठाकरे गटाकडे केवळ २० आमदार आहेत. त्यामुळे पुन्हा विधानपरिषदेत निवडून जाऊ शकणार नाहीत, याची खात्री पटल्यामुळे अहिर यांनी ठाकरे यांची साथ सोडली.
ईशान्य मुंबईचे तत्कालीन ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांचे मन वळविण्यात अहिर यांचा सिंहाचा वाटा आहे. भायखळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मनोज जामसूतकर हे अहिर यांच्या तालमीत तयार झाले आहेत. तेसुद्धा अहिर यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे म्हटले. ऑपरेशन टायगर - ३ मध्ये जामसूतकर यांचे नाव घेतले जात आहे.
सुनील शिंदे का सोडणार ?
उबाठा सेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी वरळीतील तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांना तिकीट नाकारण्यात आले होते. विधान परिषदेत पाठवून शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन केले असले तरी, आपण बांधलेला वरळी मतदारसंघ सोडावा लागला, याचा शल्य सुनील शिंदे यांना आहे. त्यामुळे अहिर यांच्याप्रमाणे शिंदेसुद्धा लवकरच सिमोल्लंघन करण्याच्या विचारात असल्यचे समजते.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून सुनील शिंदे यांना ठाकरे गटाने विधान परिषदेत पाठविले होते. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत १ जानेवारी २०२८ रोजी संपत आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेत पाठविण्याइतके संख्याबळ आता ठाकरे गटाकडे नाही. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी ते शिंदे सेनेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात त्यांना वरळीतून मैदानात उतरविले जाणार असल्याची खेळी शिंदे सेना खेळणार असल्याचेही सांगितले जाते.