Choundi Ahilyadevi Memorial Development Plan
मुंबई: चौंडी (ता.जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळाचे जतन व संवर्धन विकासासासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
जगातील सर्वश्रेष्ठ महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी चौंडी येथील त्यांच्या स्मृतिस्थळाचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार प्रयत्नशील होते. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात.
स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला. त्यास मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून ६ मे रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने खर्चाच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मंजुरीचा शासन निर्णय बुधवारी जारी केला.
या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना त्यांचे ऐतिहासिक महत्व, वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती, संस्थांकडूनच ही कामे करुन घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच काही कामे केंद्र शासनाच्या योजनांमधूनही पूर्ण करण्यात येणार आहेत. विकास आराखड्यातील सर्व कामे पुढील ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.