मुंबई : मानवी वसाहतींमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर वाढू लागल्यामुळे या दोन प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात मागील दहा महिन्यांत 47 जणांचा बळी गेला आहे, तर वनविभागाच्या डायरीत पाच वर्षांत 377 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
या डायरीनुसार, गेल्या पाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 250, तर बिबट्यांच्या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला आहे. रानडुक्कर, कोल्हे, तरस, रानगवा इत्यादी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक जण जखमी झाले आहेत. वाघ, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हे, तरस, अस्वल, लांडगा, माकड आणि खोकड यांचा वावर आता शहरी भागातही वाढला आहे. त्यामुळे मनुष्य आणि पशुधनावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. झपाट्याने होणारी जंगलतोड आणि प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर झालेल्या मानवी घुसखोरीमुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे.जंगलांची बेसुमार कत्तल झाल्याने अन्न व आश्रयासाठी वन्यप्राणी मानवी वसाहतीकडे येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्ष अटळ झाला आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडितांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु मृत्यू आणि हल्ले पाहता मदत हा उपाय नसून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राज्यात आधी मानव आणि वाघ संघर्ष गंभीर होता. आता त्यामध्ये बिबट्याची भर पडली आहे.
उसाचे क्षेत्र असलेल्या भागात वाघ नजरेस पडतात. उसाची लागवड झाल्यानंतर थेट तोडणीलाच मजूर फडात जातात. लागवड ते तोडणीमध्ये किमान चार ते पाच महिन्यांचे अंतर असते. या कालावधीत उसात शिरलेली मादी पिलाला जन्म देते. जंगलात नैसर्गिक वाढ न झालेल्या या पिलांना झाडावर चढण्याचा किंवा शिकारीचा सराव नसतो. त्यामुळे मोठी झालेली ही पिल्ले नजरेस दिसणारे ऊस तोडणी मजूर किंवा फडालगत असलेल्या मानवी वस्तीत हल्ले करतात. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे.अजित पवार, उपमुख्यमंत्री