Mumbai Redevelopment Issue Pudhari
मुंबई

Mumbai Redevelopment Issue: सिद्धिविनायका, 140 बेघर कुटुंबांनाही घर दे रे बाप्पा

मंदिर परिसरातील बिगर उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास रखडला; प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून सिद्धिविनायक मंदिराचे आधुनिकीकरण केले जात असताना त्याच परिसरातील 140 कुटुंबे मात्र गेल्या 4 वर्षांपासून बेघर आहेत. पुरुषोत्तम वाडीत भूखंड क्रमांक 884, 885 आणि 886 येथे पागडी पद्धतीने बैठ्या घरांमध्ये 140 कुटुंबे राहात होती. महेंद्र ठाकूर यांच्याकडे पुनर्विकासाचे हक्क आल्यानंतर 1986 साली भूखंड क्रमांक 886वर 6 इमारती बांधण्यात आल्या.

यात 114 कुटुंबांना पुन्हा पागडी पद्धतीनेच घरे देण्यात आली. सातव्या इमारतीचे बांधकाम रखडल्याने 26 कुटुंबे आजही त्याच जागेवर बैठ्या घरांमध्ये राहात आहेत. येथील एका भूखंडावर जमीनमालकाने विक्रीयोग्य इमारत बांधली.

26 कुटुंबांना घरे मिळालेली नसतानाही विक्रीयोग्य इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले. गेल्या 40 वर्षांत 6 इमारतींच्या देखभाल व डागडुजीकडे मालकाने दुर्लक्ष केल्यामुळे या इमारती जीर्ण झाल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

2022 साली मुंबई महापालिकेने इमारतीला सी-1 नोटीस देऊन इमारत रिकामी केली. इमारत रिकामी केल्यानंतर सर्व रहिवासी स्वखर्चातून अन्य ठिकाणी राहात आहेत. जमीन मालकाच्या अवास्तव मागण्यांमुळे विकासक येत नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत.

आजतागायत सर्व 114 कुटुंबांनी विविध ठिकाणी भाड्याने राहण्यासाठी एकूण 20 ते 22 कोटी रुपये खर्च केले आहेत; मात्र राज्य शासनाकडून किंवा अन्य कोणत्याही प्रशासनाकडून या कुटुंबांना कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. श्री सिद्धिविनायकाला नवे कोरे मंदिर उभारण्याचे काम सुरू झाले असताना आमचाही जीर्णोध्दार होईल का, असा या रहिवाशांचा सवाल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT