मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी बारावीची पुरवणी परीक्षा मंगळवारी (दि.16) सुरू होत आहे. तर ही परिक्षा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या परीक्षेसाठी ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर मुंबई विभागात १३ हजार ७०५ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तर दहावीला ११ हजार ०६४ विद्यार्थी आहेत.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावीच्या परीक्षेला एकूण २८ हजार ९७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यापैकी २० हजार ३७० मुले, ८ हजार ६०५ मुली तर १ तृयीयपंथी विद्यार्थी आहे. तसेच एकूण ५६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून यात ३६ हजार ५९० मुले, २० हजार २५० मुली तर ५ तृतीयपंथी विद्यार्थी आहे.
पुरवणी परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात सकाळी १०.३०, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा दालनात सकाळच्या सत्रात ११ वाजता, तसेच दुपारच्या सत्रात तीन वाजता प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. फेब्रुवारी-मार्चच्या परीक्षा प्रमाणे जुलै-ऑगस्टच्या पुरवणी परीक्षेमध्येही पेपरच्या दिलेल्या वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे याही परीक्षेतही वेळ वाढवून मिळणार आहे.
पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबत लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना दिली आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी असेही मंडळाने म्हटले आहे.