हिंगोली, पुढारी वृत्तसेवा वसमत ते रोडगा मार्गावर वसमत शिवारामध्ये चार चौघात पैसे का मागतो या कारणावरून तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
वसमत येथील शहर पेठ भागातील गोविंद रामजी पवार (वय 25) हा तरुण पहाटेच वसमत ते रोडगा मार्गावर वसमत शिवारात शेतात गेला होता. यावेळी संधी साधून विजेंद्र दशरथ क्षीरसागर, विष्णू रुस्तुम चव्हाण व अन्य दोघेजण शेतातील आखाड्यावर गेले. त्यांनी तू आम्हाला चार चौघात पैसे का मागतो, तसेच चार चौघात आमची इज्जत कमी का करतो या कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये गोविंद यांच्या डोक्यात चाकूचा वार केला, तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीमध्ये गोविंद गंभीर जखमी झाले. त्यानंतर चौघांनीही गंभीर जखमी झालेल्या गोविंद यांना त्यांच्या घरी आणून सोडले.
गोविंद यांना बैलाने शिंग मारल्याचे खोटे सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनी गोविंद यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले जात असताना त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. मात्र उत्तरीय तपासणीमध्ये शस्त्राने डोक्यात वार झाल्यामुळे गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
या प्रकरणात खुनाचा संशय आल्याने वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख हकीम, जमादार प्रशांत मुंडे यांच्या पथकाने तातडीने विजेंद्र क्षीरसागर, विष्णू चव्हाण व अन्य एकास ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी खूनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी शेषराव पवार यांच्या तक्रारीवरून चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :