हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्ह्यातील अवैध दारु विक्री गुटखा,मटका,जुगाराचे धंदे कायमचे बंद करण्याची मागणी प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे. सभागृहात आ. सातव यांच्या विषयावर आमदार भाई जगताप,आ.खडसे,आ.अभिजित वंजारी यांनी देखील आवाज उठविला आणि उपसभापती निलम गोर्हे व शंभुराज देसाई यांनी देखील जिल्हा प्रशासनानाला याप्रकरणी संबधितांवर अधिक कडक कारवाई करण्याचा सुचना देणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना प्रज्ञा सातव म्हणाल्या की, ग्रामीण भागत फिरत असताना गावा-गावातील महिलांसोबत विविध विषयावर चर्चा होते. त्यातून प्रकर्षाने एक गोष्ट समोर आली की, प्रत्येक खेडे गावात दुचाकीवरुन अवैध रित्या दारु पोहचविण्याची एक यंत्रणाच निर्माण झाली असून सहज रित्या गावोगावी दारु उपलब्ध होत असल्याने तरुण पिढीच नव्हे तर किशोरवयीन मुले देखील व्यसनाधीन होत आहेत. वाढत्या व्यसनाधिनतेमुळे महिलांवर देखील अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तसेच दारु बरोबरच ठिकठिकाणी मटका व जुगार अड्डे पण सरार्सपणे सुरु आहेत. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे.