परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : सोयाबीनला योग्य भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला. मात्र यावर्षीचे सोयाबीन निघण्याची वेळ आली तरी, सोयाबीनला अपेक्षित भाव काही आला नाही. दुसरीकडे शेतातील सोयाबीनचे पीक कधी पावसामुळे आणि तर कधी पीकांवरील रोगामुळे वाया जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घरी मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवलेल्या सोयाबीनला जागेवरच अळ्या लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्याशिवाय आता शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही.
गेल्या वर्षी सुरुवातीला सोयाबीनला चांगला भाव होता; पण गेल्या सहा महिन्यांपासून सोयाबीनचे भाव घसरले आहेत. बाजारपेठेत सोयाबीनला उठाव नसल्याने सोयाबीनच्या किमती वाढल्या नाहीत. आज ना उद्या सोयाबीनला योग्य किंमत मिळेल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था हातचेही गेले आणि पदरचेही गेले अशी झाली आहे. कारण घरात साठवून ठेवलेले सोयाबीन जागेवर कुजून जात आहे. वजनही घटले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला अळ्या लागायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारपेठेत सोयाबीनला प्रतिक्विंटल पाच हजार रुपये सरासरी एवढा भाव आहे. मात्र अनेक दिवस साठवून ठेवलेले सोयाबीन कवडीमोल भावात विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्याय नाही. यामुळे आधीच पावसामुळे अडचणीत आलेला शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे.
" अनेक अडचणी असताना सुद्धा सोयाबीनला भाव येईल, या आशेवर सोयाबीन घरी थप्पी लावून ठेवले पण अजून काही भाव मिळाला नाही. तसेच पावसामुळे आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतातील सोयाबीनचे पीक हातात येईल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला पाहिजे. "
– व्यंकटी मुंडे, शेतकरी, चोपनवाडी